नंदुरबार : जिल्ह्यात वादळ व पावसामुळे केळी, पपईचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत काही भागात पावसाचा हलका शिडकावा सुरू होता.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. रविवारी दुपारी नंदुरबार, शहादा व तळोदा तालुक्यातील अनेक भागात वादळासह ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला. नंदुरबारसह परिसरात साधारणत: अर्धा तास रिमझिम पाऊस सुरू होता. शहादा तालुक्यात वादळाचा जोर अधिक होता. त्यामुळे या भागात केळी व पपईच्या बागांचे नुकसान झाले. पक्व झालेले केळीचे घड वादळामुळे पडले, तर पपईची झाडे कोलमडून पडली. शहाद्यातील मुख्य रस्त्यावरील डेरेदार वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत काही भागात पावसाचा हलका शिडकावा सुरू होता.