गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा दुष्काळी परिस्थितीवर मात करीत ब्राह्मणपुरी, ता. शहादा येथील शेतकऱ्यांनी केळी लागवड करून आजपर्यंत मोठ्या कष्टाने हे पीक जोपासले आहे. यावर्षी केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळेल या आशेने वर्षभर केलेल्या कष्टाचे फळ समोर दिसत असताना १६ व १७ मे रोजी दुपारी अचानक वादळाने थैमान घातले. यामध्ये हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे.
आधी भाव कमी, आता अस्मानी संकटाने घेरले
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केळी पिकाची लागवड केली होती. केळीला भाव चांगला मिळेल या आशेने शेतकरी वर्ग आनंदात होते. परंतु, व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊनचे कारण दाखवत अडवणूक करून कमी भावात मागणी करण्यात येत होती. त्यातच आता वादळी वाऱ्याने केळीचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
वादळी वाऱ्याने वीज खांब वाकले
ब्राह्मणपुरी परिसरात झालेल्या वादळामुळे ब्राह्मणपुरी गावठाणच्या विद्युत खांबांवर झाडे उन्मळून पडल्याने विद्युत खांब वाकून वीजपुरवठा खंडित झाला होता. याठिकाणी ब्राह्मणपुरी गावाचे लाईनमन सुनील शिरसाठ, दादाभाई गिरासे, रवींद्र भोसले, अक्षय पवार, आदी कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत केला.