शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, मार्च महिन्यात बाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. यामध्ये पूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे. समूह संपर्कातून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण बाधित झाल्याचे समोर येत आहे. मागील वेळेपेक्षा यावेळेस रुग्णांचा मृत्यूदरही जास्त असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येचे प्रमाण जास्त असून, गंभीर रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. वाढत्या रुग्ण संख्येमुळे शहादा तालुक्यातील रुग्णवाहिकाही कमी पडत आहेत. ही भयावह परिस्थिती लक्षात घेता कोरोनाची साखळी तुटावी म्हणून जिल्हा प्रशासनाने १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
संचारबंदी काळात विशिष्ट वेळेत जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी बुधवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने खरेदीसाठी शहरात गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी सामाजिक अंतर न पाळणे, मास्कचा वापर न करणे असे दिसून आले. एकीकडे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना काही नागरिक मुद्दामहून शासनाने आखून दिलेले नियम तोडताना दिसून येत आहेत.
प्रशासन कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना करीत असूनही काही नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे प्रशासनाला दुर्दैवाने कडक निर्बंध लावावे लागत आहेत. १५ दिवसांचा लॉकडाऊन आदेश आजपासून लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी याचेही पालन केले नाही व रुग्ण संख्या वाढली तर प्रशासनाला अजून कठोर भूमिका घेत उपाययोजना कराव्या लागतील. म्हणून नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी केले आहे.
बँकांमध्ये मोठी गर्दी
लॉकडाऊन, मार्च एंड व सलग येणाऱ्या सुट्यांमुळे बुधवारी सर्वच बँकांमध्ये खातेदारांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील मुख्य बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होती. १ एप्रिलपासून लॉकडाऊन असल्याने उगाच घराबाहेर निघायचे नाही या उद्देशाने अनेकांनी बँकेतील कामे बुधवारीच केल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातून नागरिक आले असल्याने बँकांबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. मोठी गर्दी झाल्याने सामाजिक अंतराचा मोठा फज्जा उडाल्याचे दिसून आले.