कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी उपाययोजना म्हणून गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या आदेशानुसार काही वेळ सूट देत लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातमजुरी, शेतमजुरी करणाऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या मजूरवर्गाला काम मिळत नसल्याने त्यांना दोन वेळचे अन्न शिजवणेदेखील कठीण झाले होते. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांनी थोडे दिवस संसाराचा गाडा चालेल एवढी मदत केल्यामुळे त्यांना थोडा धीर मिळाला. मात्र, आता बळीराजा रब्बीनंतर पुन्हा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यामुळे शेती मशागतीसह सिंचन व्यवस्थेवर ठिबक पद्धतीने पपई, केळीची लागवडीची कामे सुरू झाली आहेत.
तालुक्यात शेतकरी वर्गाकडून पपई, केळी पिकाची लागवड करण्याचे काम सुरू आहे. रोपांची लागवड केल्यानंतर त्यांची जोराचे वारे, उन्हापासून तसेच कीटक, ससा यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी कॉटन स्कार्फ लावण्याचे काम सुरू असल्याने काहीअंशी या मजुरांना रोजगार निर्माण होत आहे. यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याची माहिती देण्यात आली.