नंदुरबार : लसीकरण वेग घेत नसल्यामुळे आणि जिल्ह्यासह राज्यातही कोरोना कमी होत नसल्याने यंदाही जून महिन्यात शाळांची घंटा वाजणार नाही हे जवळपास स्पष्टच आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात विशेष म्हणजे शाळेत पहिले पाऊल ठेवणारे पहिलीचे ३० हजार विद्यार्थी शाळेत न येताच थेट दुसरीत जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक प्रगतीविषयी पालकांसह शिक्षकांनाही चिंता लागून आहे.
नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाची गती जेमतेमच आहे. ग्रामिण व आदिवासी दुर्गम भागात तर अद्यापही भीती व गैरसमज कायम आहेत. त्यामुळे लसीकरण वाढत नसल्याची स्थिती आहे. लसीकरणाची गती वाढणार नाही तोपर्यंत शाळादेखील सुरू होणार की नाही हा प्रश्न आहे. कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तर चिंता अधिकच वाढली आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दुर्गम तसेच ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधेचा अभावामुळे ऑनलाइन शिक्षणाचा काहीही फायदा विद्यार्थ्यांना होत नसल्याची स्थिती होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्यात आल्या. नववी ते बारावीच्या शाळा किमान चार महिने सुरू राहिल्या, पाचवी ते आठवीच्या शाळा दोन महिने तर पहिली ते चौथीच्या शाळा जेमतेम महिनाभर सुरू राहिल्या. एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षांचे नियोजन सुरू असतांना मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
शाळा बंद झाल्याने चाचणी परीक्षा, वार्षिक परीक्षा देखील झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पाठविण्यात आले आहे. नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही शाळांनी किमान युनिट टेस्ट घेऊन त्यानुसार मूल्यमापन करून निकाल तरी दिला. परंतु प्राथमिक शाळा तसेच काही माध्यमिक शाळांनी ते देखील केले नाही.
सर्वाधिक नुकसान शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचे झाले. एकही दिवस शाळेत न जाता त्यांना थेट दुसरीत प्रवेश मिळाला आहे. तीच स्थिती माध्यमिक शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांची देखील झाली आहे. त्यांनाही सरसकट सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यात आल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुढील शैक्षणिक कालावधीत त्यांना त्याचा फटका बसणार आहे.
३० हजार विद्यार्थी जाणार थेट दुसरीत
n गेल्या वर्षी पहिलीत जवळपास ३० हजार विद्यार्थी प्रवेशित होते. त्या सर्वांना शाळेची पायरीही न चढता थेट दुसरीत प्रवेश मिळेल.
n खासगी व इंग्रजी माध्यमाच्या काही शाळांनी किमान ऑनलाइन क्लास घेऊन विद्यार्थ्यांना किमान शिक्षणाचे प्राथमिक ज्ञान तरी दिले. परंतु बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थिती अगदीच वाईट होती.
n यामुळे हे विद्यार्थी वाचन, लेखनमध्ये आगामी काळात काय प्रगती करतील याकडे लक्ष लागून आहे.