उन्हाळ्यात हळद समारंभ, लग्नसोहळ्यात बँडच्या आवाजाने अंगात नाचण्याचे बळ संचारते. तसेच ज्या घरात लग्नकार्य असेल त्या घरात लग्नाच्या पाच-सहा दिवस अगोदर गाणे म्हणण्याची प्रथा खास करून ग्रामीण भागात आजही आहे. मात्र, दोन वर्षांपासून बँडचा आवाज तसेच घरातील लग्नाची गाणी सध्या ऐकू येत नाहीत. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही अनेक लग्न सोहळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागल्यामुळे लांबणीवर टाकले गेले आहेत. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात बँडच्या आवाजामुळेच कुठेतरी लग्न सोहळा असल्याचे समजत असते. पण सध्यातरी लग्नकार्यातील या मंगल वाद्याचा आवाज ऐकण्यासाठी लोकांचे कान अजूनही आतुरलेलेच आहेत.
कोरोनाने अनेक जणांच्या लग्न सोहळ्यावर विरजण आणल्यामुळे वैवाहिक जीवनात पदार्पण करणाऱ्या वधू-वरांना कोरोना तसेच लॉकडाऊन संपल्यानंतरच्या नव्या मुहूर्ताची वाट पहावी लागणार आहे. ज्या लोकांनी लग्न सोहळे लांबणीवर टाकले आहेत त्यांनी मंडप, आचारी, बँड, घोडा यांची बुकिंग रद्द केली आहे. कारण शासन आदेशान्वये सध्या लग्न सोहळ्यासाठी फक्त २५ लोकांची परवानगी असून दोन तासांमध्ये विवाह समारंभ पार पाडायचा आहे. मात्र, अपवादाने बहुतांश लोकांनी या शासन आदेशाचे पालन करीत कमी खर्चामध्ये विवाह सोहळा उरकून घेतला आहे. अनेक लोकांनी कोरोना काळातील या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यातील मानपानाच्या गोष्टी, रुसवे-फुगवे यासारख्या गोष्टींना फाटा देत विवाह उरकून घेतल्यामुळे खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत केल्यामुळे समाजामध्ये नवीन पायंडा पडत असल्याची भावना अनेक मंडळी व्यक्त करीत आहेत.
यावर्षी सर्वाधिक लग्न तारखा मे महिन्यात असून जवळजवळ १४ मुहूर्त आहेत. चालू वर्षात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लग्न मुहूर्त नव्हते. तसेच एप्रिल महिन्यात फक्त शेवटच्या आठवड्यातच मुहूर्त होते. म्हणून अनेकांनी मे महिन्याच्या मुहूर्ताला पसंती दिली होती. कारण १२ मे पासून वैशाख महिना सुरू होत असून वैशाख व ज्येष्ठ महिना विवाहासाठी सर्वोत्तम मानले जातात. मात्र, ठरलेल्या मुहूर्तावर लग्नकार्य करायचे झाल्यास शासन आदेशाचे पालन करूनच कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडावा लागणार आहे. म्हणून सध्या तरी हौशी लोकांना लॉकडाऊननंतरच्या मुहूर्ताची वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नाही.