नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या मात्र वाढत चालली आहे. गेल्या पाच दिवसांत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या मृत्यूंमुळे पुन्हा चिंता वाढली आहे. झालेले मृत्यू हे ४० ते ७० वयोगटातील आहेत. आतापर्यंत ६७४ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार तालुक्यात झाले आहेत. तर सर्वात कमी मृत्यू धडगाव तालुक्यात झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा आकडा दैनंदिन ८० ते ३०० च्या घरात येत आहे. यामुळे समाधान व्यक्त होत असले तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. गेल्या पाच दिवसांत तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पाच दिवसांत ५० पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मृत्यूदर वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या मृत्यूंमुळे मृत्यूदर वाढण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णसंख्या गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्ह्यात सध्या तरी मृत्यूदर कमी दिसत आहे; परंतु आता कोरोना रुग्णसंख्य कमी झाली असून मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे येत्या काळात मृत्यूदर वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एकूण ६७४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या मृत्यूदर हा १.८६ टक्के इतका आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या अशीच राहिली तर येत्या काळात मृत्यूदर तीन टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
अक्कलकुवा, धडगावपेक्षा जिल्हाबाहेरील मृत्यू अधिक
जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार तालुक्यात झाले आहेत. एकूण ३०५ जणांचा मृत्यू झाला. त्या खालोखाल १७५ जणांचा शहादा तालुक्यात मृत्यू झाला आहे. नवापूर तालुक्यात ९५ जणांचा, तळोदा तालुक्यात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यापेक्षा जिल्ह्याबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही तब्बल ६४ आहे तर अक्कलकुवा तालुक्यात केवळ १६ व धडगाव तालुक्यात केवळ १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाच दिवसांत मृत्यूसत्र
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५ एप्रिल रोजी १३, ६ एप्रिल रोजी ११, ७ एप्रिल रोजी १३, ८ एप्रिल रोजी सात तर ९ एप्रिल रोजी १० जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात देखील मृत्यूसंख्या याच पटीने येत होती. त्यावेळी एका दिवसात सर्वाधिक १९ मृत्यू झाले आहेत. त्यावेळी कोरोनाचा कहर जिल्ह्यात वाढला होता. शिवाय रुग्णांना बेड न मिळणे, परजिल्ह्यात, परराज्यात उपचारासाठी जावे लागत होते. त्यामुळे मृत्यू संख्या वाढली होती. आताच्या स्थितीत कोरोना नियंत्रणात असताना देखील मृत्यूसंख्या कमी होत नसल्याचे दिसून येत असल्याने आरोग्य विभागातर्फे कारणमीमांसा करणे आवश्यक आहे.
वयोगट स्थिर
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा वयोगट हा ४० ते ७० दरम्यानचा आहे. गेल्या वर्षी अर्थात पहिल्या लाटेवेळी मृत्यूचा वयोगट हा किमान ५५ ते त्यापुढे होता. आता ४० पर्यंत खाली आला आहे.
जिल्ह्याबाहेर मृत्यू अधिक
मृत्यूची आकडेवारी केवळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या मृत्यूंची असते. जिल्ह्याबाहेर तसेच गुजरातमध्ये उपचार घेताना मृत्यू झाल्यांची आकडेवारी उपलब्ध होत नाही. त्यामुळे ती संख्यादेखील अधिक आहे. परिणामी, रेकॅार्डवरील संख्या व प्रत्यक्षातील संख्या यात मोठी तफावत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती नंदुरबारातील अमरधाममध्ये होणारे अंत्यसंस्कार व प्रत्यक्षातील शासकीय आकडा यातही मोठी तफावत राहत आहे.