रांझणी : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम, उत्तरकार्य यासारखे कार्यक्रम ५० जणांच्या उपस्थितीमध्येच पार पाडण्यास प्राधान्य दिले जात असल्याने मंडप व्यावसायिक, कॅटरर्स, बॅण्ड व्यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गेल्या वर्षी झालेले आर्थिक नुकसान यावर्षी तरी भरून निघेल अशी आशा असताना कोरोनाने व्यावसायिकांची पुन्हा निराशा केली आहे.
लग्नसमारंभासाठी केवळ ५० जणांची उपस्थिती बंधनकारक असल्याने आधी बहुतांश वर-वधू पित्यांनी बुक केलेले बॅण्ड, मंडप, डेकोरेटर्स यात मोठी कपात केल्याने बॅण्ड, मंडप व्यावसायिक हतबल झाले असून, त्यांच्याकडून आपापल्या कामगारांना आधीच खर्चासाठी दोन पैसे दिले गेल्याने आर्थिक कोंडी वाढली असून, कपात करण्यात आलेल्या ऑर्डरमध्ये कामगारही कमी लागत असल्याने चिंतेत भर पडली आहे. तसेच काही मंडप व्यावसायिकांकडून गेल्या वर्षी आपापल्या गोडाऊनचे भाडे स्वत:च्या खिशातून भरावे लागले होते. तीच गत यावर्षीही निर्माण झाल्याने ते हतबल झाले आहेत.
दरम्यान, कॅटरिंग व्यवसायही निम्म्यावर आला असल्याचे चित्र असून, काही लग्नांमध्ये महिलांकडूनच जेवण तयार करण्यात येत असल्याने कॅटरर्सची बुकिंगसुद्धा रद्द करण्यात येत आहे.