जीवनात संगतीचे फार महत्त्व आहे. चांगल्या संगतीने माणसाची समाजात किंमत वाढते आणि वाईट संगतीने समाजात किंमत कमी होत असते. त्यासाठी काही क्षण साधू वृत्तीच्या माणसाच्या संगतीत घालवले तर आपल्या जीवनाचे सार्थकता साधू शकतो. संगत ही चांगल्याची केली पाहिजे. उदाहणार्थ एखाद्या शेतकऱ्याने शेतातून गहू काढले आणि त्याची साफ सफाई न करता बाजारात विकायला नेले तर त्याची किंमत साधारणतः १००० रुपये मिळते, परंतु तेच गहू जर त्या शेतकऱ्याने साफ करून बाजारात विकायला नेले, तर त्याची किंमत साधारणतः १५०० रुपये मिळतील व त्यातील काढलेले खडे जर आपण विकायला नेले तर त्याची किंमत बाजारात शून्य असेल त्या खड्यांना कोणीही खरेदीदार मिळणार नाही. यावरून आपणास असे लक्षात येते की, गहू आणि खड्याची संगत करतात तर त्याची किंमत ५०० ने कमी होते, तर खड्यांनी गव्हाची संगत केली म्हणू किंमत शून्य असूनही त्याला १००० रुपये भाव मिळतो. म्हणून जीवन जगत असताना संगत ही चांगली असायला हवी, संगतीचा माणसाच्या चारित्र्यावर खूप मोठा प्रभाव पडत असतो.
ह.भ.प. राकेश महाराज गिरीश अग्निहोत्री तळवेकर,तळोदा