आय.जी.पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : गत लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही काँग्रेसला मताधिक्य देणाऱ्या नवापूर विधानसभा मतदार संघातून यंदाही काँग्रेसला मताधिक्य मिळेल यासाठी नेते व कार्यकर्ते सरसावले आहेत. तर भाजपाकडूनही मताधिक्य मिळविण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याने सर्वांकडुन सावध पवित्रा घेतला जात आहे.नवापूर विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला गेला आहे. २००९ ची सार्वत्रिक निवडणूक वगळता १९७२ पासून आमदार सुरूपसिंग नाईक यांनी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या रुपाने धुळे व नंदुरबार जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून नवापूरची आजवर ओळख राहिली आहे. सलग नऊ वेळा माणिकराव गावीत यांनी काँग्रेस पक्षाकडुन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते नवापूरचेच असल्याने विधानसभा व लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला नवापूरातून मताधिक्य मिळत आले आहे.पहिल्यांदा काँग्रेस कडुन लोकसभेसाठी आमदार अॅड. के. सी. पाडवी यांच्या रुपाने नवापूर तालुक्याच्या बाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. त्यांना उमेदवारी देण्यावरुन उद्भवलेली राजकिय असंमजसाची स्थिती निवळली आहे. मात्र मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ काँग्रेसला नवापूरात मिळत नसल्याचे चित्र आहे.विश्वासात घेऊन काम करीत नसल्याची उघड नाराजी माजी आमदार शरद गावीत यांनी बोलवून दाखवली असुन ते अॅड. के. सी. पाडवी यांच्या प्रचारात सहभागी न होता डॉ. हिना गावीत यांच्या प्रचारार्थ गुंतले असल्याचीही मतदारसंघात चर्चा आहे.गेल्या निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार माणिकराव गावीत यांना एक लाख ४४५ मते तर भाजपा उमेदवार डॉ. हिना गावीत यांना ८७ हजार ५२७ मते मिळाली होती. मतांचा फरक पाहता मोदी लाटेतही काँग्रेसला भाजपा पेक्षा १२ हजार ९१८ मते जास्त मिळाली होती. लोकसभा मतदारसंघात केवळ नवापूर मतदारसंघाने काँग्रेसला लीड दिला होता. काँग्रेसला सुमारे एक लाखाचे मताधिक्य देखील नवापूरातून गतकाळात मिळालेले आहे. मताधिक्यासाठी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुरुपसिंग नाईक, माजी खासदार माणिकराव गावीत, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरिष नाईक व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्यासारखे अनुभव संपन्न लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते कामास लागले आहेत.दुसरीकडे आपला हक्क स्थापित व्हावा यासह मताधिक्य मिळविण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. प्रदीप वळवी, अनिल वसावे, एजाज शेख, शैला टिबे, सविता जयस्वाल, कमलेश छत्रीवाला त्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपाचे काही जून्या पदाधिकाºयांनी बंडाळी केली असल्याने त्याचा परिणाम पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
मताधिक्याची परंपरा कायम टिकविण्यासाठी काँग्रेसची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 12:12 IST