दिवसोंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर संपूर्ण परिसरात विशेष खबरदारी प्रशासनातर्फे बाळगली जात होती. मात्र, मार्च महिन्यात बाधितांचा वेग वाढला असला तरी प्रशासनाच्या उपाययोजना कमी पडत असल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रशासनातर्फे चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी ज्या रुग्णांनी तपासणीसाठी स्वॅबचे नमुने दिले आहेत अथवा ज्यांच्या तपासणीचा रिपोर्ट येणे बाकी आहे अशा रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवणे गरजेचे असतानाही तेथे ठेवले जात नसल्याने असे संभावित संशयित रुग्ण दिवसभर गावात फिरत आहेत. परिणामी ते अनेकांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढत आहे, तर दुसरीकडे ज्यांना होम क्वारंटाइन म्हणून उपचाराच्या सुविधा दिल्या असल्या तरी अशांतर्फे विशेष खबरदारी बाळगली जात नाही व यावर प्रशासनाचे पाहिजे तेवढे लक्ष नसल्याने सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे.
शहरासह तालुक्यात कमालीची बाधितांची संख्या वाढत असल्याने शहरातील सर्व हॉस्पिटल हाऊसफुल झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे कुठे, असा प्रश्न नातेवाइकांसमोर निर्माण झाला आहे. दुसरीकडे अनेक बाधित रुग्ण उपचारासाठी गुजरात राज्यातील सुरत येथे जात असून, सुरतच्या अनेक हॉस्पिटलमध्ये शहाद्यातील असंख्य रुग्ण उपचार घेत आहेत. अशा उपचार घेत असलेल्यांची नोंद प्रशासनाकडे नाही, परिणामी या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी झालेली नाही यामुळेही संक्रमण वाढत असल्याचे बोलले जात आहे.