राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा निरिक्षक विनय भोईटे, किर्तीकुमार शिंदे व राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनी नंदुरबार जिल्ह्याला भेट दिली. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या बैठकीत पक्षाचे संघटन, बांधणी या संदर्भात चर्चा करणेत आली. केंद्र सरकार व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, महागाईचा भडका दिवसें दिवस वाढत असल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. प्रत्येक मनसे सैनिकाने आपापल्या भागात केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडून या विरोधात आंदोलने करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ही सामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासह त्यांचे प्रश्न सुटावे याकरिता पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांने आपापल्या भागात जोमाने कार्य करावे, असे विनय भोईटे यांनी सांगीतले. तसेच किर्तीकुमार शिंदे व राज्य उपाध्यक्ष रावसाहेब कदम यांनीही मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
बैठकीस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे, उपजिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह राजपूत, शहादा तालुका अध्यक्ष दिनेश नेरपगार, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, तळोदा शहर अध्यक्ष सुधाकर माळी, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष अमय राजहंस, विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव योगेश सोनार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.