शेतीकामे ठप्प होण्याला सर्वस्वी लॉकडाऊन कारणीभूत असून हे असेच ३० तारखेपर्यंत चालले तर पेरणी तोंडावर येऊन शेती पडीक तर पडणार नाही ना? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यासाठी शासनाने शेतीसंबंधीची दुकाने दिवसभर उघडण्याची मुभा दिली; परंतु बँकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट हे पूर्ण व्यवसाय ठप्प करण्यासाठी कारणीभूत ठरत असून, याचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसायाला बसत आला आहे. त्याचबरोबर खतांच्या भावातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने बळिराजाचे आर्थिक नियोजन कोलमडताना दिसत आहे. शेतकरी अशा कठीण काळातही पोशिंदा बनून सर्वांची भूक भागवत असताना खर्चाच्या मानाने उत्पन्नाबाबत कमी पडत असताना भावाचे समीकरण जुळत नसतानाही या व्यवसायात टिकून आहे. सध्या खरीप पिकाची पेरणी तोंडावर येऊन ठेपली असून कडक लॉकडाऊनमुळे बँका व इतर सर्व शेतीसंबंधी दुकाने बंद असल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यातच बँका या ठरावीक वेळेत सुरू आहेत आणि या महिन्यात बँकांना शासकीय सुट्ट्या जास्त असल्यामुळे पीककर्जाविषयी कामे तसेच किरकोळ व्यवहार करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांचे बँकेत पैसे असताना आर्थिक व्यवहार सध्या बंद असल्याने ट्रॅक्टर व मजूर पैशांअभावी कामाला येणे टाळत आहेत. मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला असून, बँकेची कर्जप्रकरणेही लॉकडाऊनच्या नावाखाली बंद झाली असल्याने पेरणी कशी करावी? या चिंतेत सध्या शेतकरी असून, पेरणीलाच यावर्षी मुकावे लागते की काय? अशी परिस्थिती सध्या झाली आहे.
अनेक शेतकऱ्यांची बागायतीला मूठमाती
आज अनेक शेतकऱ्यांनी भाजीपालावर्गीय पिकांची शेतात लागवड केली असताना अचानक १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लागल्याने माल विकावा तरी कसा? या चिंतेने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांत ट्रॅक्टर फिरविला आहे. अगोदरच लागलेला खर्चही निघाला नसताना ही परिस्थिती ओढवल्याने पुन्हा बागायती नकोच म्हणून त्यांनी घरातच बसणे पसंत केले आहे.
बँक व्यवहार बंदचा सर्वाधिक फटका
शेतकरी वर्ग हा जवळपास रोखीने सर्व व्यवहार करीत असल्याने व हा वर्ग अजूनही ऑनलाइन जमान्यात खूप मागे असल्याने बँका बंद राहणे त्यांच्यासाठी उपाशी राहण्यासारखे ठरते. सर्वाधिक बँक बंदचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. बँकांचे व्यवहार बंद असल्याने ट्रॅक्टरच काय, मजूरही कामाला येत नसल्याने शेतीकामे ठप्प झाली आहेत.