भाजी मंडीत पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून नवीन सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, व्यावसायिकांकडून या भागात कचरा व खराब भाजीपाला टाकण्यात येत असल्याने कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत. त्यामुळे या भागात वराह व मोकाट गुरांचा वावर वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात पालिकेच्यावतीने व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात येत असून, याठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. के. स. मार्केट भागातील स्वच्छतागृहाजवळ उघड्यावरच कचरा टाकण्यात येत आहे. पशुवैद्यकीय दवाखाना, खासदार निधीतून खेळाडूंसाठी क्रीडा भवन बांधण्यात आले असून, अनेक वर्षांपासून बंद असल्याने त्याच्या मुख्य प्रवेशद्वारातच कचरा टाकण्यात येतो आहे.
शहरातील जनता चौक, भाजी मंडई, नगरपालिका परिसर, नगरपालिका शाळा परिसर आदी भागांमध्ये पालिकेने लाखो रुपये खर्चून कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची सोय केली आहे. तसेच काही मुख्य चौकात ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. तरीही व्यावसायिक उघड्यावरच कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरत असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरामध्ये विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यात येते. या वाहनातून वन विभाग कार्यालय, नगरपालिका शाळा, जनता चौक या भागात सामान उतरल्यानंतर वाहनातील कचरा रस्त्यावर टाकला जातो. पालिकेच्या स्वच्छता पथकाने कचरा टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्यांचे फोटो काढून कायदेशीर कारवाई केल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात यावर्षीही नंबर मिळावा, यासाठी पालिकेची टीम मेहनत घेत असून, घंटागाड्यांची सोय करण्यात आली आहे. तसेच कचराकुंड्या असूनही काही व्यावसायिक रस्त्यांवर कचरा टाकत असल्याचे निदर्शनात आले आहे. अशांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
- राहुल वाघ, नगरपालिका मुख्याधिकारी, शहादा
नगरपालिका, जनता चौक आदी परिसरातील मुख्य रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांची माहिती पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- राजेंद्र चव्हाण, स्वच्छता निरीक्षक, शहादा