नंदुरबार तालुक्याचे शतकपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:07 PM2020-06-30T12:07:10+5:302020-06-30T12:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना रुग्णांच्या संख्येत नंदुरबार शहरासह तालुक्याने शतक पुर्ण केले आहे तर धडगाव तालुक्याने सुदैवाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना रुग्णांच्या संख्येत नंदुरबार शहरासह तालुक्याने शतक पुर्ण केले आहे तर धडगाव तालुक्याने सुदैवाने खातेही खोलले नसल्याची स्थिती आहे. नवापूर तालुक्यानेही चांगला कंट्रोल राखत एका रुग्णाच्या वर संख्या जाऊ दिली नाही. दुसरीकडे कोवीड तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या देखील नंदुरबार तालुक्यातच सर्वाधिक अर्थात तब्बल १,१५३ इतकी आहे. तर धडगावला अवघ्या ३१ जणांची तपासणी झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने गेल्या आठवड्यात दीड शतक गाठले आहे. तब्बल १६३ जण कोरोनाबाधीत झाले असून त्यातील ७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ६ जणांनी आपला जीव गमावला आहे. सर्वाधिक बाधीत रुग्ण हे नंदुरबार तालुक्यात आहेत. तालुक्यातील सर्वाधिक लोकांना क्वॉरंटाईन करण्याचीही वेळ आलेली आहे. प्रशासनातर्फे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असले तरी संख्या कमी होत नसल्याची स्थिती आहे.
जिल्ह्यातील पहिला आणि
सर्वाधिक रुग्णही नंदुरबारातच
जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण नंदुरबारात आढळला व सर्वाधिक रुग्णही नंदुरबार तालुक्यातच आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यात ६६ रुग्ण आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात ११० रुग्ण आढळून आले. त्यातील ४६ रुग्ण बरे झाले असून ३ जणांनी आपला जीव गमावला आहे. एकुण १,१९४ जणांची कोवीड तपासणी करण्यात आली आहे. सद्य स्थितीत संस्थात्मक विलगीकरणात तब्ल १२५ जण आहेत. नंदुरबार शहरातील चारही बाजुंच्या कॉलनीसह दुधाळे, रनाळे, रजाळे, सैताणे, नटावद या गावांना रुग्ण आढळून आलेले आहेत.
शहादा : तीन मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुळे एकुण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात नंदुरबार शहरातील तीन तर शहादा तालुक्यातील तीन जणांचा समावेश आहे. तालुक्यात नंदुरबार खालोखाल सर्वाधिक २० रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात पहिला रुग्ण शहादा शहरातील होता. आढळलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाल्याने भितीचे वातावरण पसरले होते. परंतु शहादा शहरवासीयांनी कोरोनाला बऱ्यापैकी अटकाव आणण्यात यश मिळविले. सद्य स्थितीत तालुक्यातील केवळ ६ रुग्णच जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत तर १४ रुग्ण बरे झाले आहेत.
एकुण ३२५ जणांची कोवीड तपासणी तालुक्यात करण्यात आली असून सध्या ४२ जण संस्थात्मक क्वॉरंटाईन आहेत. शहादा शहरासह बामखेडा, हिंगणी, लोणखेडा, मंदाणा, तोरखेडा येथे रुग्ण आढळून आले आहेत.
तळोदा : अचानक संख्या वाढली
जिल्ह्यात जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत तळोदा व धडगाव तालुके हे कोरोनामुक्त होते. परंतु बाहेर गावाहून आलेल्यांनी तळोद्यात कोरोनाचा शिरकाव करण्यास मदत केली. एकुण १८ रुग्ण तळोद्यात आढळून आले आहेत. अवघ्या दोन आठवड्यात तालुका कोरोना रुग्ण संख्येत जिल्ह्यात तिसºया स्थानावर आला आहे. सद्य स्थितीत तळोद्यातील १४ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर चार रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यातील १२८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात ४७ जण आहेत.
दुर्गम भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आला. परंतु मोलगी येथे अखेर शिरकाव झालाच. तो देखील बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे. दुसरीकडे धडगाव तालुका अद्यापही कोरोनामुक्त आहे. तालुक्यातील जनतेने कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही. येत्या काळात देखील शिरकाव होऊ नये यासाठी तालुकावासी सज्ज आहेत. परंतु बाहेर गावाहून ये-जा करणाºया कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबीवर प्रतिबंध घालावा आणि दुर्गम आदिवासी भागातील जनतेला कोरोनामुक्तच राहू द्यावे अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. मोलगीत जी संख्या वाढली आहे ती पोलीस कर्मचाºयांची आहे. मोलगी व परिसरातील सामान्य माणसाचा त्यात समावेश नाही. अक्कलकुवा येथील यापूर्वीचे चारही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महामार्गावर असलेले आणि गुजरातच्या सिमेवर लागून असलेल्या नवापूर तालुक्यात देखील कोरोनाचा शिरकाव झाला नाही. केवळ विसरवाडी येथील एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाली. त्याच्यापासून इतरांना होऊ नये म्हणून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी कोरोनाला अटकाव करता आला. दुसरीकडे नवापूर शहराला लागून असलेल्या गुजरातमधील गावातील काही रुग्ण आढळून आले. शहरवासीयांनी लागलीच उपाययोजना केल्या आणि कोरोनाला सिमेवरच रोखले. आजच्या स्थितीत धडगाव नंतर नवापूर तालुका कोरोनाला अटकाव करण्यात यशस्वी झाला आहे. तालुक्यातील ७० जणांची कोवीड तपासणी करण्यात आली आहे. सद्य स्थितीत तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नसल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. यापुढेही कोरोनामुक्त तालुका राखण्यासाठी तालुकावासीय प्रयत्नशील आहेत.