या संदर्भात आता पोलिसांनी जरी गांभीर्याने घेतले असले तरी मुख्यतः ही जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. शहरातील स्वच्छतेचा लाखोे रुपयांचा ठेका दरवर्षी खासगी कंपन्यांना पालिकेमार्फत दिला जातो. त्यात शहरातील नागरिकांच्या घरातील कचरा गोळा करणे व संपूर्ण शहराला कचरामुक्त ठेवणे ही जबाबदारी असते, मात्र ठेकेदाराकडून असे न होता फक्त वरवर साफसफाई दाखवून घनकचऱ्याच्या नावाने लाखोंचा मलिदा राजरोसपणे रीतसर लाटला जात आहे. तसेच गल्लोगल्ली, रस्त्यांवर, गटारीत व्यापाऱ्यांकडून टाकलेला कचरा, चौकाचौकात अस्तव्यस्त पडलेला कचराच मोकाट गुरांना, वराहांना व बेवारस कुत्र्यांना आमंत्रित करीत असतो. तेथेच जे मिळेल ते खाऊन निर्धास्तपणे शहरभरात हिंडत असतात तर काही शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक वसाहतींच्या रस्त्यांवर ठाण मांडून बसतात तर कधी रस्त्यांवर झुंज होते. यामुळे अनेक वाहनधारकांचा, पायी चालणाऱ्या नागरिकांचा अपघात होतो. मात्र या मुक्या बेवारस फिरणाऱ्या गुरांचे, वराहांचे, मोकाट कुत्र्यांचे करणार तरी काय, यांच्याविरोधात तक्रार देणार काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. परंतु यांचे मालक त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न घेऊन निर्धास्तपणे यांच्यासारखेच मोकाट फिरतात. खरेतर त्यांची पालिकेने धरपकड करून त्यांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे व मालक न सापडल्यास त्या गुरांची रवानगी कायदेशीरपणे गोशाळेत केली पाहिजे. मात्र, पालिका प्रशासनालाही याचे काहीही सोयरसुतक दिसत नाहीसा. मात्र, आत्ता शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी सोमवारी सोशल मीडियावर मोकाट फिरणारे गुरे व वराहांच्या संदर्भात नागरिकांना तक्रार देण्यासह त्यांच्या मालकांवर कठोर कारवाई करण्याची पोस्ट व्हायरल करून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. यात पालिका प्रशासन काय भूमिका निभावते ते येणारा काळच ठरवेल.
मोकाट फिरणाऱ्या गुरे व वराहांमुळे वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST