लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : करोना विषाणूचा संसर्ग एका संक्रमीत रुगणाकडून अन्य इसमास होण्याची शक्यता विचारात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार जिल्ह्यातील सात स्थळांचे क्वॉरंटाईन सेंटर म्हणून अधिग्रहण करण्याचे निर्देश दिले आहेत.पॉलिटेक्निक कॉलेज नंदुरबारमधील ३० खोल्या, सेवा सहकारी संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मुलांचे वस्तीगृह नवापूर येथे ४० खोल्या, सेवा सहकारी संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मुलींचे वस्तीगृह नवापूर ३० खोल्या, आदिवासी मुलांचे वस्तीगृह शहादा ८० खोल्या, आदिवासी मुलींचे वस्तीगृह खापर २४ खोल्या, आदिवासी मुलांचे वस्तीगृह आमलाड ता.तळोदा ४० खोल्या आणि आदिवासी मुलांचे वस्तीगृह मांडवी बु. ता.अक्राणी येथील ३० खोल्यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आपत्तीच्या परिस्थितीत या ठिकाणी करोना विषाणूच्या संशयित रुग्णास अलगिकरण करून निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (कोव्हीड-१९) उपायोजना नियम २०२० नुसार कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
४करोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील परमिट रुम, वाईन शॉप, बियर शॉपी, मोह फुलांचे विक्री केंद्रे, देशी दारू आदी ठोक आणि किरकोळ विक्रेते यांच्या आस्थापना बंद राहतील. किरणा दुकान, मेडीकल स्टोअर्स, गॅस पुरवठा, दुधाची दुकाने आणि तत्सम जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मेस येथे बसून जेवण करण्यास बंदी टाकण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मेस केवळ तयार अन्नाचे पार्सल विक्री करू शकतील. आदेशाचे संबंधितांनी पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.४जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समिती ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत बाजार समिती अध्यक्ष, सचिव व संचालक यांनी तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार यांनी आदेशाचे पालन करावे. शेतकऱ्यांनी या काळात कुठलाही शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये. भुसार मालासह भाजीपाला मार्केटसाठी देखील हे नियम लागू राहणा आहेत.