याप्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरुन भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील पंचशील नगरात राहणाऱ्या सुनिताबाई संजय ईशी यांच्या कुटुंबाने प्रकाशा (ता. शहादा) येथे लहान मुलाचा जाऊळ काढण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांनी भाऊ राहुल भाईदास पिपंळे (रा. सुरत) यास आमंत्रित केले होते. राहुल हा त्याच्या दोन-तीन मित्रांसोबत आला होता. या कार्यक्रमात भात कच्चा असल्याचे कारणा देत त्याने सुनिताबाई यांच्यासोबत वाद घातला होता. दरम्यान, ३० मार्च रोजी दुपारी दोन वाजता संशयित राहुल पिपंळे व त्याच्या मित्रांनी शहादा येथील पंचशीलनगर गाठून पुन्हा वाद उकरुन काढला होता. यातून राहुल याने सुनिताबाई ईशी या आपल्या सख्ख्या बहिणीला आणि तिच्या कुटुंंबीयांना बेदम मारहाण करुन पळ काढला. या घटनेनंतर सुनिताबाई यांनी थेट शहादा पोलीस ठाणे गाठत भाऊ राहुल व त्याच्या साथीदारांविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल अशोक कोळी करत आहेत. या मारहाणीच्या प्रकरणाची दखल घेत पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी संशयित राहुल याचा शोध घेण्यासाठी सुरत येथे पथक पाठविले होते. परंतु, तो फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जावाळाच्या कार्यक्रमात भात कच्चा निघाला म्हणून भावाची बहिणीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST