लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यात ६० टक्केपेक्षा अधीक पुस्तकांचा पुरवठा झाला असून शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांवर ते पोहचविले जाणार आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके देण्यात येतील अशी माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी दिली.समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिले ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी देण्यासाठी नंदुरबार तालुका शिक्षण विभागाने तयारी पुर्ण केली आहे. तालुक्यात पहिली ते आठवीचे एकुण ५० हजार ९५५ विद्यार्थी आहेत. त्यांना २ लाख ९१ हजार ८७४ एवढी पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. त्यापैकी जूनच्या पहिल्या आठवडाअखेर १ लाख ५७ हजार ३७३ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत.उर्वरित पाठ्यपुस्तके येत्या दोन दिवसात प्राप्त होणार आहेत. सर्व पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी संंबधीत शाळांवर पोहचती होणार आहेत. त्यासाठीचे नियोजन पुर्ण करण्यात आले आहे.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके प्राप्त होतील यासाठी तालुका शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी दिली. यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सचिन गोसावी, केंद्र प्रमुख वाघ, बोरसे, गटसाधन केंद्र कर्मचारी चौरे, बेडसे, पाटील हे त्यासाठी मेहनत घेत आहेत.