लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने रोजगार बंद पडले आहेत. हाती पैसा नसल्याने उपासमार होऊ लागल्याने परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाहनाने व पायपीट करीत गावाकडे परतू लागले आहेत. गुजरातमध्ये रोजगारासाठी गेलेले बिहारमधील युवक सायकलीने गावाकडे रवाना होत आहेत.कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. रोजगारासाठी गेलेल्या परप्रांतीय मजुरांचे तेथे हाल होत असल्याने हे मजूर आता गावाकडे परतू लागले आहेत. बिहारमधील काही युवक सायकलीने जात असताना प्रकाशा येथे त्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, रोजगार बंद पडल्याने आमच्याजवळ जे पैसे होते ते खर्च झाले. आता उपासमार होण्यापेक्षा गावाकडे जाणे पसंत केले. मात्र तेथपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे व इतर प्रवासी वाहतूक सेवा नसल्याने आम्ही नव्या सायकली विकत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यात सुरेंद्र चौधरी नामक परप्रांतीय मजुराच्या भावजयीचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याला गावी पोहोचणे गरजेचे असल्याने तोही सायकलीने रवाना होत आहे.गुजरात ते बिहार थेट सायकलीने प्रवास करणाऱ्या या मजुरांचे चित्र वेदनादायी आहे. एका सायकलीवर दोन जण बसून प्रवास करीत आहेत. एका मजुराच्या हातावर १५ दिवसापूर्वी लोखंडी रॉड पडल्याने तो जखमी अवस्थेत सायकलीवर प्रवास करीत आहे. सोबत पाण्याचा ड्रम व मुरमुराचे पाकीट घेत त्यांनी प्रवास सुरू केला आहे. या मजुरांची जागोजागी जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. शहादा येथे राष्टÑीय स्वयंसेवक संघातर्फे योगेश रोहिदास पाटील यांनी त्यांची जेवणाची व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरात ते बिहार मजुरांचा सायकलीने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:19 IST