गेल्या वर्षी जेेव्हा कोरोनाचा संसर्ग आला त्यावेळी जिल्ह्यात जेमतेम ५० बेडची सुविधा होती. परंतु परिस्थितीचे गांभीर्य पाहून आहे त्या यंत्रणेत आणि सोयीतून सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि शासनाकडे पाठपुरावा केला. त्याला जनता, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही सहकार्य मिळाल्याने आज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा बऱ्यापैकी विस्तार झाला आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून १२४० ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सुविधा असून जिल्हाभरातील आयसोलेशन वॅार्डातही पाच हजारांपेक्षा अधिक बेड आहेत. याशिवाय अजूनही नवीन ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती करण्यासाठी तयारी सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता रुग्णांना बेड मिळत नाही ही तक्रारच राहणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाची साथ वाढली असा आरोप होत आहे?
-कुणी काय तक्रार करावी किंवा आरोप करावे याबाबत आपण बोलू शकत नाही. पण गेल्या वर्षभरापासून प्रशासन अहोरात्र परिश्रम घेऊन काम करीत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. या जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधा तोकड्या आहेत. जिल्ह्यात एकही वैद्यकीय महाविद्यालय नाही, डॅाक्टर नाहीत, परिचारिका नाहीत, अनेक पदे रिक्त आहेत. जेेव्हा संसर्ग आला तेेव्हा तपासणीसाठीही दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून होतो. मात्र सुरुवातीला स्वतंत्र आधुनिक लॅब केली. त्याचा विस्तारही केला. ऑक्सिजन बेडची सुविधा वाढवत गेलो. स्वतंत्र ऑक्सिजन प्लान्ट बसविले. खासगी रुग्णालयातील सुविधांचा विस्तार केला. आयसोलेशन वॉर्ड वाढविले. गावपातळीवर सर्वेक्षण मोहीम यासह जे जे शक्य ते प्रशासनाने केले आहे. त्याचे चांगले परिणाम आज सर्वजण पाहत आहेत. अगदी दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत.
ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण...
जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्रकल्प सुरू केेले आहेत. शहाद्यात तिसरा आणि तळोदा आणि नवापूर येथेदेखील दोन मिनी प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात लिक्विड टँक बसविण्याची प्रक्रिया सुरू असून तेथे २० मे. टन ऑक्सिजनचा साठा राहील अशी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा रुग्णालयात पाईपने ३०० बेडला ऑक्सिजन पुरवठा करण्याची सुविधा होत आहे. सध्या शासकीय ४४० व खासगी मिळून एकूण १२४० ऑक्सिजन बेड आहेत. त्यांचेही विस्तारीकरण सुरू आहे.
गावपातळीवर आयसोलेशन...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, होस्टेल्स या ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड करण्यात आले आहेत. या ठिकाणी जवळपास पाच हजार ६० बेड असून आता होम आयसोलेशन रुग्णांची संख्या कमी करणार आहोत.