नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्तरावर रोजगार नसल्याने दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक मजूर परराज्यात हंगामी स्थलांतरित होतात. दरवर्षी साधारणत: दिवाळीनंतर मजुरांचे स्थलांतर सुरू होते आणि एप्रिल-मेमध्ये हे मजूर आपल्या मूळगावी परततात. लॉकडाऊनमुळे देशभरातील व्यापार, व्यवसाय, उद्योग ठप्प झाल्याने जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले मजूरही गेल्यावर्षी महिना दोन महिने अगोदरच मूळगावी परतले. त्यासाठी त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले. सुरुवातीला प्रशासनाने परवानगी नाकारली, नंतर प्रशासन मेहरबान झाले आणि रोजगार हमीची कामे सुरू केली. सुरुवातीच्या काळात मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. त्यामुळे गावी परतलेल्या मजुरांचा उदरनिर्वाहाची चिंता दूर झाली होती. रोहयोच्या कामांवर रोज २५ हजारांपासून ते ६५ हजारांपर्यंत मजुरांची संख्या गेली होती. गेल्या २० वर्षांत एकाच दिवशी सर्वाधिक मजूर रोहयोच्या कामांवर उपस्थित राहण्याचा विक्रम गेल्यावर्षीच झाला. त्यामुळे रोजगार हमी योजना स्थलांतरित मजुरांसाठी फायदेशीर ठरली.
गेल्या वर्षभरात रोहयोमुळे एक लाख दोन हजार ९४१ कुटुंबांना रोजगार मिळाला, तर त्यांना ८३ कोटी रुपयांपेक्षा अधिक मजुरी मिळाली. रोहयोअंतर्गत सीसीटी, एलबीएस, कंपार्टमेंट बंड, गट लागवड, गाळ काढणे, गोठा, घरकूल, नाडेप, फळबाग, मजगी, माती नाला बांध, रस्ता दुतर्फा वृक्षलागवड, रस्ता काम, राजीव गांधी भवन, अंगणवाडी इमारत बांधणे, रोपवाटिका, वर्मी कंपोस्ट, विहीर पुनर्भरण, वृक्षलागवड, विहीर खोदणे, शेततळे, शौचालय, शोषखड्डे आदी विविध स्वरूपाची कामे उपलब्ध करून देण्यात आली.
तालुकानिहाय चित्र पाहिल्यास अक्कलकुवा तालुक्यात १० हजार ३७१ कामे, अक्राणी तालुक्यात आठ हजार २५०, नंदुरबार तालुक्यात चार हजार ६५, नवापूर तालुक्यात सात हजार २५, शहादा तालुक्यात सहा हजार ९३२ आणि तळोदा तालुक्यात तीन हजार ८२४ अशी एकूण ४० हजार ३३७ कामे मजुरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या कामांवर जवळपास ८३ कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे.
अर्थात ऑक्टोबरनंतर मात्र रोहयोच्या कामांवरील मजूर संख्या कमी होऊ लागली. लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्याने बहुतांश मजूर पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरित झाले. त्यामुळे सद्य:स्थितीत रोहयोच्या कामांवरील मजुरांची संख्या दहा हजारांवर आली आहे.