खरीप हंगाम नापिकीचा ठरल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, मका, हरभऱ्याची पेरणी अधिक प्रमाणात केली होती. हा माल घरात येत नाही तोच कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने शासनाने राज्यात लॉकडाऊन लागू केले. या लॉकडाऊन काळात वाहतूक तसेच इतर मोठ्या शहरात व्यवहार बंद असल्याने व्यापारीही शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास कचरत आहे. त्यामुळे या हंगामात घरी आलेला माल शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
खेडा खरेदीतसुद्धा शेतकरी लुबाडला जात आहे
सद्य:स्थितीत शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून, त्यासाठी लागणारी मजुरांची मजुरी अथवा यंत्राचे भाडे देण्यासाठीसुद्धा शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नसल्याने काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच शेतमजूर आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्याकडेच आर्थिक सुबत्ता नसल्यामुळे जगण्याचे मोठे हाल होत आहे.
शेतीची मशागत यंत्राच्या साह्याने केल्याशिवाय शेतकऱ्याकडे पर्याय उरला नाही. तसेच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचेही दर वाढले आहेत. त्यामुळे शेती करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
चारा टंचाई
चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेती मशागतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर वाढल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामापूर्वी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी प्रशासनाने कृषीविषयक दुकानाची वेळ वाढवून दिली आहे. मात्र, संचार बंदीमुळे शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. बी-बियाणे, खतेही महागण्याचे चित्र आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवले आहे.