तळोदा : शहरातील रोकडमल हनुमान मंदिर साधारण १५० वर्षांपूर्वीचे प्राचीन असून एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे नवसाला पावणारा हा मारुती असल्याने येथे दर शनिवारी भाविक भंडारा देतात असे असले तरी हे देवस्थान विकासापासून उपेक्षितच राहिले आहे. निदान तेथील पक्का रस्ता व इतर सुविधा तरी उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी आहे.
तळोदा शहरात गावातील हनुमान मंदिर,हतोड्या रस्त्यावर गोऱ्या हनुमान ,मराठा चौकातील लष्करी हनुमान, दलेलपूर रस्त्यावरील रोकडमल हनुमान अशी चार मंदिरे आहेत.तथापि शहारापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रोकडमल हनुमान मंदिर खूप प्राचीन आहे. १८८२ पूर्वीचे आहे.एक जागृत देवस्थान म्हणून ते सर्वत्र ओळखले जात असते. ते दक्षिण मुखी आहे. सदर मंदिर एका शेतात वसले आहे. १८८४ ला जेव्हा प्लेगची दुसरी लाट आली होती, तेव्हा सर्व तलोडेकर गाव सोडून गावाच्या शिवेलगत असलेल्या या मंदिर परिसरात तब्बल दीड,दोन महिने राहिले असल्याचे जुने जाणकार लोक सांगतात. याशिवाय विजयादशमीला सीमोल्लंघन करण्यासाठी शहरवासी येथे येत असल्याची परंपरा आहे. रोकदमल मारुती संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याबरोबर गुजरातमधील सीमावर्ती भागात एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जात असल्यामुळे भाविक आपला नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. साहजिकच यामुळे दर शनिवारी कोणीना कोणी भक्त भंडारा देत असतो. भाविक देखील प्रसादासाठी जातीने हजेरी लावतात. पूर्वी केवळ लहानसा डरा असलेल्या या मंदिरास भक्तांच्या आर्थिक मदतीतून टुमदार मंदिर बनले आहे.विशेष म्हणजे सदर मंदिरात कुठलेही ट्रस्ट नाही. केवळ भक्तांच्या आर्थिक मदतीतून देखभाल,दुरुस्तीच्या खर्च चालत असतो.
विकासापासून उपेक्षितच
तालुक्यात प्रसिद्ध असलेलं हे जागृत देवस्थान विकासापासून उपेक्षितच राहिले आहे. दर शनिवारी भाविकांच्या मोठा राबता असतो.अंकलेश्वर, बऱ्हाणपूर महामार्गाच्या वळण रस्त्यावरून जवळच असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधा रस्ता नाही. जो आहे तो ही अतिशय अरुंद आहे. साधी दोन लहान चार चाकी एकमेकांसमोरून जाताना अक्षरशः कसरत करत काढावे लागत असते. रस्ता कच्चा असल्यामुळे भाविकांना पावसाळ्यात चिखल तुडवत मंदिरात दर्शनासाठी जावे लागत असल्याची भाविकांची व्यथा आहे.वास्तविक शासनाच्या गॅझेटमध्ये या मंदिराचा समावेश करण्यात आला असल्याचे म्हटले जाते. तरीही अजून विकासापासून वंचित आहे. निदान लोकप्रतिनिधींनी तरी सदर जागृत देवस्थानच्या विकासाबाबत ठोस प्रयत्न करण्याची मागणी आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी देखील निवडणुकीतील आपल्या प्रचाराच्या शुभारंभ मंदिराचे दर्शन घेऊनच करीत असतात.
१९५३ साला पूर्वी या हनुमान मंदिर परिसरात पाण्याची टंचाई होती. त्यामुळे शहरातील भाविक हनुमान जयंतीच्या आधी पाच ते दहा घागरी कावड पाणी नेऊन मंदिराची साफ सफाई करीत असत. त्यानंतर हनुमानाला शेंदुरचे लेपन लावत असत. शिवाय जंगलातून बांबू आणून जयंतीच्या दिवशी त्याला ध्वज चढवून पूजा अर्चा केली जात होती. हनुमान जयंती व विजयादशमीच्या दिवशी हा ध्वज बदलला जात होता.त्यानंतर काळाच्या ओघात ही परंपरा बंद पडली.