नवापूर : शहराला पोल्ट्री हब म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. गुजरात-महाराष्ट्र राज्यात अंडी सप्लाय करणारे मोठे केंद्र म्हणून प्रख्यात आहे. या ठिकाणी तब्बल १५ वर्षांनंतर बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने ३०-३५ करोड रुपयांचे नुकसान झाले. कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला साधारण कुक्कुटपालन व्यवसाय सुरू होण्यासाठी साधारणत: एक दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. नुकसानभरपाई पूर्ण मिळाले नसल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये नाराजी कायम आहे.
नवापुरातील एकूण ३० पोल्ट्री बर्ड फ्लूबाधित झाल्या होत्या. पोल्ट्रीतील आठ लाख ९८ हजार २७३ कोंबड्यांचे व दहा हजार ९१२ अन्य पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले. ५९ लाख ८३ हजार २८७ अंडी नष्ट करण्यात आली.
राज्य सरकार व केंद्र सरकारने आतापर्यंत कुक्कुट पक्ष्यांची नुकसानभरपाई म्हणून आठ कोटी दिले आहेत, तर अंडीसाठी एक कोटी ८० लाख रुपये पोल्ट्री व्यावसायिकांना अदा करण्यात आले आहे. केंद्र सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना वाढीव नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती नवापूर पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरिया यांनी दिली आहे.
नवापूर तालुक्यातील सर्व पोल्ट्रीतून साधारण दहा लाख कोंबडीतील ७५ टक्के उत्पादन घेतले तरी दररोज नवापूर शहरातून गुजरात व महाराष्ट्र राज्यात सुमारे साडेसात लाख अंडी पाठवण्यात येत होते. मोठी आर्थिक उलाढाल होती. कोरोनाचा पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात कोविड कक्षामध्ये कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांनी अंडी खाण्याचा सल्ला दिल्याने मोठ्या प्रमाणात नवापूरची अंड्यांची मागणी महाराष्ट्रासह गुजरात राज्यात होती त्यावेळेस अंड्याला पाच-सहा रुपयांपर्यंत भाव आला होता.
२००६ मधील बर्ड फ्लूला २० कोटींची मदत
पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाल्याने माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या पाठपुराव्याने २० कोटी रुपयांची नुकसानभरपाई शासनाने दिली होती. मोठी कोंबडी ४० रुपये, लहान कोंबडी २० रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात आली. फेब्रुवारी २००६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात ५२ पोल्ट्री फार्म बर्ड फ्लू संक्रमित झाले होते.