गेल्या वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून, याचा फटका भटक्या विमुक्त जमातीला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. उदरनिर्वाहासाठी गावोगाव भटकंती करून जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीच्या कुटुंबातील कर्ते पुरुषही कोरोनाने हिरावले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूर्वापार भटक्या जमातीतील वेगवेगळे समाजबांधव हे विविध प्रांतात फिरून तसेच गावोगावी जाऊन आपली कला सादर करून पोट भरत असत. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्याही रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. एकंदरीत सद्य:स्थितीत रोजगाराअभावी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असून, घरात बसून कुटुंबाचे पोट भरायचे तरी कसे? हा प्रश्न सतावत आहे. अशा परिस्थितीत भटक्या विमुक्त समाजाला शासनाने मदतीचा हात पुढे करत प्रत्येक कुटुंबाला दरमहा पाच हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी तळोदा तालुका भटके विमुक्त परिषदेचे अध्यक्ष श्याम राजपूत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भटक्या-विमुक्त जमातीसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST