या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारतर्फे अंगणवाडी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सर्व जिल्हास्तरावर कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आपल्या नंदुरबार जिल्ह्यात अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याकारणाने अनेक इच्छुक पात्र महिला बेरोजगार असून, नोकरीच्या शोधात फिरत आहेत. अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये अनेक महिलांना रोजगार मिळणार आहे. परंतु तळोदा तालुक्यात साधारण २०१७-१८ नंतर आताच भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. २०१७-१८ नंतर लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका अशा वेगवेगळ्या कारणांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. तसेच कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमुळे भरती प्रक्रिया थांबली होती. यामुळे अनेक इच्छुक पात्र महिलांचे वय तब्बल चार वर्षांनी वाढले आहे. काही महिला भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार असून, हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेतील वयामध्ये शिथिलता देऊन त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्याकडे देण्यात आली आहे.
यावेळी गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना संघटनेचे नंदुरबार जिल्हा प्रवक्ता गणपत पाडवी, मुकेश पाडवी, सुरेश पाडवी, दीपक वळवी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.