नंदुरबार : शहरातील विविध भागांत दिवसभरात रुग्णवाहिकांची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या रुग्णवाहिकांना शहरातील नागरिक वाहने बाजूला करुन जागा देत आहेत. जिल्हा रुग्णालयाकडे तसेच खासगी दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णवाहिकांना शहरातील अरुंद रस्त्यांवरुन जावे लागते. अशावेळी नागरिक स्वत:ची वाहने बाजूला घेत जागा करून देत आहेत.
वसुलीला ब्रेक
नंदुरबार : जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची वसुली मोहीम मार्चच्या प्रारंभी सुरू करण्यात आली होती. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या या मोहिमेला सध्या ब्रेक लागल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत प्रशासन सध्या कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने ही वसुली तूर्तास थांबविल्याचे चित्र गावोगावी दिसून आले आहे.
आरोग्य विभागाने मार्गदर्शन करावे
नंदुरबार : ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेलाही गती आली आहे. दरम्यान, सध्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. परंतु, अद्यापही अनेक गावांमधील ज्येष्ठ नागरिक लस घेण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. त्यांना आरोग्य विभागाने मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आहे. लसीबाबत आरोग्य केंद्र व उपकेंद्रातच माहितीपत्रके उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण जनतेची सोय होणार आहे.
मसाले विक्रीत वाढ
नंदुरबार : शहरातील प्रसिद्ध अशा मिरची उद्योगाला यंदा सुगीचे दिवस आले आहेत. मिरची पावडर व मसाले विक्री करणाऱ्यांनी शहरातील वळणरस्त्यालगत दुकाने थाटली असून ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. गेल्यावर्षी लाॅकडाऊनमुळे या उद्योगांना मोठा फटका बसला होता.
कैऱ्यांची आवक
नंदुरबार : बाजारपेठेत सध्या ग्रामीण भागातून कैऱ्यांची आवक वाढली आहे. या कैऱ्यांना मागणी असल्याने नंदुरबार व नवापूर तालुक्याच्या विविध भागांत झाडावर लगडलेल्या कैऱ्या ताेडून त्यांची विक्री केली जात आहे. हिरव्यागार कैऱ्या उन्हापासून बचाव करण्यास गुणकारी असल्याने त्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
खासगी पाणीपुरवठादारांना सूट द्यावी
नंदुरबार : जिल्ह्यात आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी कडक लाॅकडाऊन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे. परंतु, सकाळी शहरी व ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पाणी पुरवठादारांना परवानगी देत त्यांना पाणीपुरवठा करण्याची मुभा देण्याची अपेक्षा जिल्ह्यातून व्यक्त करण्यात येत आहे.
तपासण्यांची गरज
नंदुरबार : शहरातील मोकळ्या पटांगणांवर मुक्काम ठाेकत किरकोळ वस्तू विक्री व भिक्षुकी करणाऱ्यांची तपासणी करण्याची गरज आहे. यातील अनेक जण हे बाहेरगावाहून प्रवास करून येतात. आर्थिक समस्येमुळे हे नागरिक रुग्णालयात जावून तपासण्या करून घेवू शकत नाहीत.
कृत्रिम पाणीटंचाई
नंदुरबार : वीज वितरण कंपनीच्या थकीत बिलांची वसुली न झाल्याने जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या पाणी योजनांची वीज तोडण्यात आली आहे. यामुळे त्या-त्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देत या समस्येतून ग्रामस्थांना मुक्त करण्याची मागणी होत आहे.