लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : टारगट लोकांविषयी पोलीसात तक्रार दिल्याचा राग येवून पोलिसांनीच कोठडीत डांबले. पुन्हा पुन्हा त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करीत न्याय मिळावा यासाठी घुन्सी, ता.अक्कलकुवा येथील परदेशी कुटूंबातील चार महिलांनी मंत्रालय गाठून कैफियत मांडली. शिवाय आत्मदहनाचा इशाराही दिल्याने खळबळ उडाली आहे.घुन्सी येथील रमिला विजेसिंग परदेशी, कमली मानसिंग परदेशी, मोगरा गुलाबसिंग परदेशी या महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोरजी रित्या तडवी, रमेश बुध्या तडवी, दनेश गोरजी तडवी, जयंतीलाल किलया तडवी, बबीता कांतीलाल तडवी, लता दिनेश तडवी, सेवतीबाई गोरजी सर्व रा.रायसिंगपुर ता.अ.कुवा जिल्हा नंदुरबार हे आम्हाला घरी येवुन शिवीगाळ व दमदाटी आणि जिवेठार मारण्याची धमकी देत होते. त्याच्या निषेधार्थ न्याय मिळण्यासाठी पोलिसात अर्ज केला होता.त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ३० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी दहा वाजता अक्कलकुवा पोलीस ठाण्यातून लेडीज पोलीस नसतांना पोलीस कर्मचारी आले व घरात घुसुन आम्हा चौघा महिलांना अक्कलकुवा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. नंतर काहीही कारण न देता सोडून दिले. यामुळे परदेशी परिवारातील या महिला भयंकर घाबरल्या. गावातही दहशतीखाली राहू लागले.वारंवारच्या धमकीमुळे आणि जाचामुळे या कुटूंबांचे गावात राहणे मुश्किल झाले. त्यामुळे परदेशी परिवारातील या महिलांनी १० जानेवारी रोजी मुख्यमंत्र्याकडे तक्रार अर्ज केला, परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी आम्ही मंत्रालयात आत्मदहनासाठी आलो असल्याचे या निवेदनात म्हटले होते. त्याची दखल घेत मंत्रालय पोलिसांनी या चारही महिलांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश मंत्रालय स्तरावरून अक्कलकुवा पोलिसांना देण्यात आल्याचे समजते. त्या दृष्टीने चौकशी सुरू होणार आहे.
आमळी-घुन्सी येथील महिलांचा मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:47 IST