नंदुरबार : यंदा कोरोनामुळे उशिराने शाळा उघडल्या. ॲानलाइन क्लास व कोरोनाचा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे यंदा दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी किती प्रमाणात नोंदणी करतात, याकडे लक्ष होते; परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधीक असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात आहे.
यंदा शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा झाला. पहिले शैक्षणिक वर्ष तर घरी बसूनच शिकण्यात गेले. दुसऱ्या सत्रात अर्थात नोव्हेंबर महिन्यात दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी कोरोनाच्या भीतीने उपस्थितांची संख्यादेखील कमीच राहिली. अशा स्थितीत किती विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ होतात, याकडे लक्ष लागून होते. विद्यार्थी गॅप घेतात किंवा कसे, याबाबतही तर्कवितर्क लावले जात होते.
अशी आहे नोंदणी
n दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वीच झाली आहे. कोरोनामुळे परीक्षा होतात का? झाल्याच तर त्या कशा होतील, याची शाश्वती नव्हती. असे असतानाही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यात पसंती दिली.
n दहावी परीक्षेसाठी यंदा जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थी वाढले आहेत तर बारावीसाठी साधारणत: ८०० ते हजार विद्यार्थी गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढले आहेत.
n लवकरच आता दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने त्या-त्या शाळांमध्ये तयारीदेखील सुरू झाली आहे. लवकरच बोर्डाकडून रिसीट मिळणार असून, त्यानंतर या परीक्षा होतील.
दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना असतानाही विद्यार्थ्यांचे प्रविष्ठ होण्याचे प्रमाण चांगले आहे. शिक्षण विभागाच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. बहुतेक सर्वच शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे.
-एम.व्ही.कदम,
माध्यमिक शिक्षणाधिकारी.
अभ्यासावर भर
n परीक्षा कुठल्या स्वरूपात होतील, याकडे लक्ष न देता विद्यार्थी आपल्या अभ्यासावर भर देत आहेत. कुठल्या स्वरूपातून परीक्षा झाल्या, तरी त्यासाठी पालक मुलांची तयारी करून घेत आहेत.