तळोदा येथे मागील पंधरवड्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करून सर्रासपणे दुकाने सुरू ठेवणाऱ्या विविध व्यावसायिक व व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली होती. सुरुवातीला त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. मात्र दंड आकारल्यानंतरदेखील काही व्यापाऱ्यांची दुकाने सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर मात्र प्रशासनाने कठोर भूमिका घेत काही व्यापाऱ्यांची दुकाने सील केली.
तळोदा येथे रोज सकाळी बाजारात यात्रेचे स्वरूप दिसून येत आहे. प्रशासनाने गावातील काही दुकाने सील केली; मात्र काही दुकाने सील केली नाहीत. त्यामुळे ते व्यापारी व्यापार करीत आहेत. प्रशासनाने ही भेदभावाची वागणूक कापड व्यापाऱ्यांना देऊ नये, अशी तळोद्यातील व्यापाऱ्यांची भावना आहे. यासंदर्भात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अजय परदेशी यांची सोमवारी सकाळी भेट घेऊन आपली भूमिका त्यांच्यापुढे मांडली. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार गिरीश वखारे यांचीदेखील भेट घेत त्यांचे म्हणणे प्रशासनदरबारी मांडले. या शिष्टमंडळात राजेंद्र जैन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गौतम जैन, कांतिलाल जैन, खुशाल जैन, मुन्ना जैन, कांतिलाल सेठिया, लुनकरण जैन, करण जैन, कुशल पारेख आदी व्यापाऱ्यांचा समावेश होता.
गावात कोणाचा मृत्यू झाल्यास किंवा कुणाकडे लग्न, समारंभ असल्यास त्याला कापड, नवीन कपडे आवश्यक असते. परंतु शासनाने कापड दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारे कापड व इतर वस्तू घेण्यासाठी नातेवाईकांना भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. तरीदेखील वस्तू उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
शासनाने इतर दुकानदारांना दुकान उघडण्यासाठी वेळ दिली आहे, तीच वेळ कपडा व इतर व्यापाऱ्यांनादेखील द्यावी. दुकान बंद असल्यावरसुद्धा व्यापाऱ्यांना नोकरांचे व कर्मचऱ्यांचे पगार, विद्युत बिल आणि बँकेचे व्याज भरावेच लागते. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला थोडावेळ तरी दुकान उघडण्याची मुभा द्यावी. जनतेची गैरसोय टाळावी, अशी मागणी कापड व्यापारी असोशिएशनची असून, यासदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची महिती असोशिएशन अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी दिली आहे.