डॉ. भारुड म्हणाले, लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. जिल्ह्यात दररोज १० हजार व्यक्तींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, कमी लसीकरण झालेल्या गावात शिबिराचे आयोजन करावे. पावसाळ्यापूर्वी अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्याच्या दुर्गम भागातील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे. या नागरिकांच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिलेल्या स्कूल बसचा उपयोग करावा. कोरोना लसीकरणाची मोहीम सुटीच्या दिवशीदेखील सुरू ठेवावी.
कोरोनाबाधित आढळलेल्या गावात मोहीम स्तरावर आरटीपीसीआर चाचण्या घेऊन संपर्क साखळी खंडित करण्याचा प्रयत्न करावा, वारंवार बाधित आढळणाऱ्या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे, कोरोनाबाधित व्यक्तीला तातडीने संस्थात्मक अलगीकरणात स्थलांतरित करून उपचार सुरू करावे, गावात संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत कोरोना लसीकरण मोहीम आणि संपर्क साखळी शोधमोहिमेचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.