नंदुरबार : पहिल्या लॅाकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बुडाले त्यामुळे अर्थचक्र विस्कटले, अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. आता कोरोनाचे पुन्हा नव्याने रुग्ण आढळून येत असल्याने लॅाकडाऊनची भिती व्यक्त होत आहे. परंतु आता लॅाकडाऊन कुणालाच परवडणारे नाही. त्यामुळे ते टाळायचे असेल तर प्रत्येकाने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या मर्यादित आहे. परंतु इतर जिल्ह्यात वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातदेखील प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. कडक नियम लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होईल की काय? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. तसे झाल्यास जेमतेम उद्योग, व्यवसायाची रुळावर आलेली गाडी पुन्हा रुळावरून घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत चर्चादेखील सुरू आहेत. त्यामुळे अनेकांची पाचावर धारणा बसली आहे. लॉकडाऊन नको असेल तर प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावे, प्रतिबंधांची कडक अंमलबजावणी करावी.