नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील कोलवीमाल हे गाव अक्कलकुवा पोलीस ठाण्याला जोडण्यात यावे, अशी मागणी ॲड. रूपसिंग टी. वसावे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे यांना निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, कोलवीमाल हे गाव सध्या मोलगी ठाण्याच्या अंतर्गत येते. कोलवीमाल हे गाव अक्कलकुवाहून फक्त १३ कि.मी. अंतरावर आहे. मोलगी हे पोलीस ठाणे कोलवीमालहून ७० ते ८० कि.मी. अंतरावर आहे. कोलवीमाल येथील काही पाड्यात अद्यापपर्यंत रस्त्याची सोय-सुविधा नसल्याकारणास्तव गावात काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मोलगी पोलीस ठाणे हे गावाहून मोठ्या अंतरावर असल्याने पोलीस प्रशासनास वेळेवर माहिती देता येऊ शकत नाही. मोलगी हे गावदेखील दुर्गम भागात असल्याकारणाने फोनवरदेखील पोलीस ठाण्यात संपर्क होऊ शकत नाही.
मोलगी पोलीस ठाण्यात जाण्यासाठी अक्कलकुवा व्हाया मोलगीला तक्रार, फिर्याद, खबर देण्यासाठी जावे लागते व लोकांना वेळेवर वाहन उपलब्ध न झाल्यास तक्रारदार व इतर लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गावात एखाद्या लोकांचे अपघाती निधन झाले तर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू नोंद करून मयत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठीदेखील मोलगी ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठीदेखील वेळेवर वाहन उपलब्ध होत नाही व मोलगी येथे जाण्यासाठी डोंगराळ व घाट वळणाचा रस्ता असल्यामुळे एखादी खबर देण्याचे झालीच तर पूर्ण दिवस हा येण्याजाण्यातच जात असतो व गावात कोणत्याही कंपनीचे टावर उपलब्ध नसल्यामुळे मोलगी पोलीस ठाण्यात वेळेवर कोणतीही माहिती पोहचवू शकत नाही.
गावातील लोकांना कुठल्याही प्रकारच्या तक्रारी देण्यासाठी अक्कलकुवा पोलीस स्टेशन हे सोयीचे असल्याने लोकांचे होणारे आर्थिक नुकसानदेखील टळेल व गावात कोणत्याही प्रकारचे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास एका तासाच्या आत अक्कलकुव्याला कुठलीही तक्रार गावकरी देऊ शकतात व कोलवीमाल ते मोलगीचे अंतर पाहता व लोकांच्या गैरसोय लक्षात घेता कोलवीमाल गावाचा पोलीस ठाण्याचा कारभार हा मोलगी पोलीस ठाण्याहून अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात यावा, असेही ॲड. रूपसिंग टी. वसावे यांनी म्हटले आहे.