नंदुरबार : शहरात मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर वाहन तसेच वस्तू विक्रीची वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या थांब्याबाबतही कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.
नंदुरबारातील अनेक मुख्य रस्त्यांवर फळ, भाजीपाला तसेच विविध वस्तू विक्री करणाऱ्यांची वाहने उभी असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे कारवाईची मागणी करण्यात येत होती. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये नेहरू पुतळा परिसरात मनीष आयलदास दहेरा यांनी दुकानासमोर विक्रीच्या सायकली लावल्या होत्या. द्वारकाधीश मंदिरासमोर बाबेश शंकरलाल रंगलानी यांनी टीव्ही दुरूस्तीच्या दुकानासमोर खराब टीव्हीचे खोके ठेवले होते. शास्त्री मार्केटमध्ये योगेश अमृत शिंपी यांनी त्यांच्या कापड विक्रीच्या दुकानासमोर प्लास्टिक कागदाचे रोल ठेवले होते. सी. बी. पेट्रोलपंपसमोर सोनू गुरुमुखदास मंदाणा यांनी पाणीपुरीची लॅारी वर्दळीच्या ठिकाणी उभी केली होती. याच परिसरात आकाश राजकुमार कुकरेजा यांनीही पाणीपुरीची लॅारी लावली होती. या सर्वांवर नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या थांब्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.