कोरोनाचा वाढता फैलाव कसा रोखावा, यासाठी जिल्ह्यात लाॅकडाऊन व आठवड्यातून चार दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच शासनाच्यावतीने राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम ग्रामीण भागासाठी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये राबविली जात आहे. कोरोना लस सुरक्षित आहे व तिचे कुठलेच दुष्परिणाम नाहीत. तरी प्रत्येक नागरिकाने या लसीकरणात सहभागी व्हावे, विषयावर प्रबोधन करुन जनजागृती केली जात आहे. कळंबू येथील जमुनाबाई चिंधा रोकडे (माळी) या ९७ वर्षांच्या आजीबाईंनी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणात सहभाग घेऊन कोरोना लस घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतिलाल पावरा, डॉ. राकेश पाटील, आरोग्य सेविका दीपाली गिरासे, आरोग्य सेवक योगेश ठाकूर आदी उपस्थित होते. कोरोनाला आपल्याला हरवायचे आहे, तर सर्व नागरिकांनी कोरोना लसीबद्दल भीती न बाळगता लसीकरणात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी या आजीबाईंनी केले.
शासनाच्यावतीने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबविले जात आहे. लस सुरक्षित असून, नागरिकांनी मनात कुठलीही भीती न बाळगता लसीकरणात सहभाग घ्यावा.
-डॉ. राकेश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र, कळंबू, ता. शहादा