लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रेमविवाह केल्याच्या वादातून जमावाने मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील सात जणांना तळोदा प्रथमवर्ग दंडाधिकारी यांनी ६ महिने सश्रम कारावास व एकत्रीत २४ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.तळोदा येथील ईस्माईल बागवान यांनी गावातीलच मलक सुलतान हुसेन यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्याचा राग मलक व त्यांच्या नातेवाईकांना आला होता. याबाबत तंटा मिटवून मुलीला वडिलांकडे सोपविण्यात आले होते. त्या वादातून ५ मे २००७ रोजी सकाळी साडेअकरा वाजता ईस्माईल बागवान यांना आठ जणांच्या जमावाने लोखंडी चेन, लाकडी दांडा, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. नागरिकांनी जमावाच्या तावडीतून त्याची सुटका केली होती. याबाबत ईस्माईल बागवान यांनी तळोदा पोलिसात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरिक्षक सैय्यद यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र सादर केले होते. न्या.एस.डी.हरगुडे यांच्या समोर हा खटला चालला. त्यांनी एकुण पुरावे पहाता अलीम मलीक हुसेन, सोहेब मलीक हुसेन सुलतान, मलक विकार मलक रेहमान, मलक रहीम मलक हुसेन, मलक सुलतान मलक हुसेन, मलक हसीम मलक अफजल आणि अहमदखान रेहमानखान पिंजारी, रा.मलकवाडा, तळोदा यांना ६ महिने सश्रम कारावास व प्रत्येकी ३५०० रुपये असा एकुण २४,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अॅड.धिरजसिंह चौहान यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार रमेश साळी होते.
तळोद्यातील ७ जणांना सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:46 IST