बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा होणाऱ्या ५५ गावे आणि १० पाड्यांसाठी केवळ ५ वीज कर्मचारी कार्यरत आहेत. यामुळे दुरुस्तीची कामे पूर्ण करताना कंपनीच्या या कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडत आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोरद येथे वीज कंपनीचे उपकेंद्र आहे. येथून तळोदा तालुक्यातील सपाटीवरच्या आणि सातपुड्यात असलेल्या ५५ गावांसह १० पाड्यांवर वीजपुरवठा करण्यात येताे. घरगुती वीज ग्राहकांसोबत कृषीपंपधारक येथून वीज घेतात. यासाठी गावठाण आणि कृषी अशा फिडरवर ७०० ट्रान्सफॉर्मर आहेत. या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणे तसेच वीज तारांमध्ये अडचणी निर्माण झाल्यास वीजपुरवठा बंद होतो. ही दुरुस्तीची कामे करण्यासाठी बोरद उपकेंद्राकडे केवळ सहा तांत्रिक कामगार अर्थात वायरमन आहेत. एकाच वेळी दोनपेक्षा अधिक ठिकाणी बिघाड झाल्यास या कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ होते. पावसाळ्यात दुरुस्तीचे काम करणे शिक्षाच असल्याचे हे कर्मचारी सांगतात. साहित्याची कमतरता असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यातून वीज कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडल्या आहेत. ५५ गावांत दुरुस्तीचे किरकोळ कामही निघाल्यास वायरमन येईपर्यंत ग्रामस्थांना ताटकळावे लागत आहे. शेतशिवारात ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. यातून विजेअभावी मोटर बंद पडल्यास पीक नुकसानीला शेतकरी सामोरे जात आहेत. वीज कंपनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बोरद वीज उपकेेंद्रासाठी वाढीव पदे मंजूर करून ती तातडीने भरावीत, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
सपाटीवरची गावे अशी
उपकेंद्रांतर्गत बोरद, मोड, खेडले, तऱ्हावद, खरवड, छोटा धनपूर, करडे, गुंजाळी, मोहिदे, कळमसरे आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये तसेच शेतीफिडरवर सातत्याने दुरुस्तीची कामे निघतात.
बोरद उपकेंद्रात १६ वायरमनची पदे भरणे आवश्यक असताना केवळ पाच जण नियुक्त आहेत.
दुर्गम भाग अंधारात
मालदा, तुळाजा, कालीबेल, लाखापूर, बन व न्यूबन आदी दुर्गम भागातील गावे आणि त्यांच्या पाड्यांपर्यंत वीज पोहोचली असली तरी तार तुटल्यानंतर तेथील विद्युत पुरवठा कायम राहण्याची शक्यता मावळते.
या ठिकाणी चार ते पाच दिवस दुरुस्तीला लागतात.
दोन उपकेंद्रांची गरज
बोरद उपकेंद्रातील भार कमी व्हावा यासाठी रेवानगर आणि धनपूर अशा दोन उपकेंद्रांचा प्रस्ताव तालुकास्तरावरून देण्यात आला आहे. या केंद्रांमुळे दुर्गम भागातील अक्राणी महालपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे प्रस्तावात सूचित केले गेले आहे.
कंपनीकडे पदभरतीबाबत प्रस्ताव दिला आहे. अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. पाठपुरावा सुरू आहे. सद्य:स्थितीत या ठिकाणी सहा कर्मचारी कामावर आहेत. आणखी ११ वायरमनची गरज आहे.
- विलास गुरव,
कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र बोरद, ता. तळोदा.