तळोदा : राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील ५३ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू कोरोना महामारीने झाला आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक अन् शिक्षकांवरच अधिक क्रूर काळाने घाला घातला आहे. दरम्यान, खावटी अनुदानाच्या कामामुळे संसर्ग झाल्याचा आरोप शिक्षकांनी केला असून शासनाने त्याचा कुटुंबांना विम्याचे संरक्षण देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. साहजिकच यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातही त्याचा माणसाच्या शरीरात वेगाने संसर्ग वाढत असल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. परिणामी राज्याचा मृत्यूदरदेखील वाढला आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत चालवल्या जाणाऱ्या शासकीय व खासगी अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचारी यांचेही कोरोनाने निधन झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत जवळपास ५३ कर्मचाऱ्यांचा या महामारीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार प्रकल्पातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांचा अधिक समावेश आहे. सध्या राज्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये खावटी अनुदानाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साहजिकच कर्मचाऱ्यांनादेखील या कामांमुळे प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडे जावे लागत असते. त्यामुळे साहजिकच संपर्क वाढल्याचे शिक्षक सांगतात. परिणामी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे म्हटले जाते. या सर्वच कर्मचाऱ्यांनी खावटी अनुदानासाठी शासनाचे काम केले आहे.त्यामुळे त्यांचा बीमा संरक्षणाच्या लाभ नातेवाईकांना द्यावा, अशी मागणी आहे.
शासकीय आश्रम शाळेतील ५३ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST