नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात २५९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातही अवघ्या महिनाभरात २३९ जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या मृत्यूला आळा घालणे प्रशासनापुढे आव्हानच आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोना नियंत्रणात होता. पहिला रुग्ण सापडण्यास १८ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. दुसरी लाट साधारणत: मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली. या काळात रोज ५०० ते १२००पर्यंत नवीन रुग्ण आढळून आले. त्यातही मृत्यूची संख्या वाढत गेली. गेल्या दीड महिन्यात अनेकवेळा आठ ते १८ जणांचा मृत्यू एका दिवसात झाल्याची नोंद आहे. महिनाभरापूर्वी १८ मार्चपर्यंत एकूण २४० जणांचा मृत्यू झाला होता. ही संख्या आता १८ एप्रिलला ४७९ झाली आहे. त्यातही अवघ्या चार दिवसांत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १५ एप्रिलला सर्वाधिक १८ जणांचा मृत्यू झाला आहे.