नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदर यामुळे प्रशासनाने १ एप्रिल पासून १५ दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला होता. या १५ दिवसांच्या कार्यकाळातच जिल्ह्यात १२ हजार २५१ नवीन कोरोनाबाधित समोर आले होते. दरम्यान १ एप्रिल ते एक मे या काळात जिल्ह्यात १७ हजार ७६८ नवीन बाधित रुग्ण समोर आले होते.
कमी अधिक प्रमाणात आढळणारे कोरोना रुग्ण आणि दिवसाला किमान एक असा मृत्यूदर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरीपासून कोरोनाचा विस्फोट होण्यास सुरुवात झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला ५०० रुग्ण समोर येणे सुरु झाले. ही संख्या वाढत जाऊन आठवडाभरात दिवसाला १ हजारापर्यंत पोहोचली होती. यातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्व उपाययोजना करुनही रुग्ण संख्या घटत नसल्याने अखेर एक एप्रिलपासून १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण लाॅकडाऊन घोषित केला होता. यानंतरही जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही वाढती राहून २५ हजाराच्या पार गेली होती. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ६११ जणांचा काेरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातून जिल्ह्याचा मृत्यूदर हा १. ८ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत २९६ जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ अशी ही संख्या होती. परंतु ३१ मार्च ते १ मे या कालावधीत या एक महिन्यात जिल्ह्यात एकूण ३१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूदर तोच असला तरी त्याचा स्पीड रेट हा वाढला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
ग्रामीण भागात रुग्ण वाढल्याने वाढली प्रशासनाची चिंता, उपाययोजनांना गती
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात उसळल्याचे दिसून आले. जिल्ह्यात एकूण ५८६ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३५९ ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार तालुक्यात ४५, नवापूर ७६, शहादा १२५, तळोदा ६७, अक्कलकुवा २९ तर धडगाव तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोना रुग्ण होते.
जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णसंख्येत नंदुरबार तालुक्यात १४ हजार १०७, शहादा ११ हजार १००, तळोदा ३ हजार ३७०, नवापूर ३ हजार ३९८, अक्कलकुवा ८०५ तर धडगाव तालुक्यात ७१० रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ३३ हजार रूग्णांपैकी २५ हजार नागरिक कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
संचारबंदी काळातही कोरोनाबाधित वाढीस लागत असल्याचे प्रमुख कारण नागरिकांचा संपर्क कमी न होणे हेच असल्याचे सांगण्यात आले. यातून टेस्ट वाढल्याने रुग्ण समोर येत होते. ग्रामीण भागात मास्कचा वापर कमी असल्याचे दिसून येत होते. यातून प्रशासनाने लसीकरण व जनजागृतीचा वापर वाढवल्याने एप्रिलच्या अंतिम आठवड्यात रुग्णसंख्येला काही अंशी ब्रेक लागल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
या कारणांमुळे वाढली अन् घटली रुग्णसंख्या
जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही रुग्णसंख्या घटत नव्हती. उपचार मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ होत होती. यातून वाढलेले बेड, उपचारांसाठी रेमडेसिविरचे रेशनिंग, पुरेसा ऑक्सिजन यातून उपचार घेणाऱ्यांना दिलासा मिळाला.
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमुख कारण जिल्ह्यात बाहेरगावाहून येणारे प्रवासी असल्याचा दावा होत होता. प्रामुख्याने मध्यप्रदेशातून येणारे तसेच मोठ्या शहरातून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग होत होता.
लाॅकडाऊन आणि जिल्हाबंदी यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे. प्रशासनाने आरटीपीसीआर व रॅपिड अशा दोन्ही चाचण्या वाढवल्या असल्याने रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाल्याची माहिती दिली गेली आहे.