ग्रामीण भागात लस घेण्याबाबत मोठ्या प्रमाणावर उदासीनता आहे. प्रशासकीय पातळीवरून जनजागृती सुरू आहे. मागील दोन महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक, पोलीसपाटील, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना लसीकरणाबाबत वेळोवेळी जनजागृती केली. तसेच गावात दोनवेळा नमुने घेण्यात आले. त्यात एकूण ३५५ जणांची तपासणी केली. पैकी ५७ व्यक्तींचे विलगीकरण कक्षात समायोजन केले. त्यात दोन व्यक्तींचा जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे मृत्यू झाला असून, ५५ व्यक्तींवर यशस्वी उपचार करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावात वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुसुमवाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मणिलाल शेल्टे, डॉ.चंकी पराडके, डॉ.प्रफुल्ल धनगर, परिचारिका नीता नाईक, आशाबाई भिल, पर्यवेक्षक संजय दळवे, सरपंच, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील, तलाठी, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक व शिक्षक, अनुदानित आश्रमशाळा मुख्याध्यापक व शिक्षक, अंगणवाडीसेविका व आशा कार्यकर्ती यांनी परिश्रम घेतले.