मांजरमच्या ३३ के.व्ही. वीज केंद्रातून मांजरमसह परिसरातील अठरा गावांना वीजपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या.. ना.. त्या.. कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. हवेची झुळुक आणि पावसाच्या चार थेंबांचीही वीजपुरवठ्यास बाधा होत आहे. दरम्यान, २७ मे रोजी देखभाल- दुरुस्तीसाठी संपूर्ण दिवसभर अठरा गावांचा वीजपुरवठा खंडित ठेवण्यात आला. सायंकाळी सव्वासहा वाजता वीजपुरवठा सुरू झाला आणि काही वेळातच पावसाचे चार थेंब येताच त्याचक्षणी वीजवाहिनीवर फाॅल्ट नावाची बाधा झाली. त्यामुळे अठरा गावे अंधारात बुडाली. परिणामी वातावरणातील प्रचंड उकाड्यात डासांच्या चाव्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. वारंवार वीजपुरवठा खंडित ठेवण्यात मांजरमच्या वीज वितरण कार्यालयाने उच्चांक गाठला आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
दिवसभर दुरुस्तीच्या अन् रात्रभर फाॅल्टच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST