१९५६ ला किनवट तालुका हा आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. किनवट, माहूरला वळसा घालून वाहणारी पैनगंगा नदी ओलांडून विदर्भ गाठावे लागते. तसे पाहता किनवट, माहूर या तालुक्यांच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व दैनंदिन उपयोगात येणाऱ्या अनेक सोयीसुविधा तेलंगणाच्या आदिलाबादशी निगडित आहेत. आजही आदिलाबाद व निर्मल येथूनच शेतात पेरण्यासाठी लागणारी बियाणे व इतर साहित्य तेथूनच आणले जाते. समाज व भाषा आदिलाबाद जिल्ह्याची व किनवट, माहूर तालुक्यांची सारखीच आहे. जी भाषा आदिलाबाद जिल्ह्यात बोलली जाते, तीच भाषा किनवट-माहूर तालुक्यांत बोलली जाते. निजाम राजवटीतून आंध्र प्रदेशातील असिबाबाद जिल्ह्यातून किनवट तालुका महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात समाविष्ट करून ६० वर्षे झाली, तरी सांस्कृतिक व रूढी-परंपरा सारख्याच आहेत.
उल्लेखनीय म्हणजे किनवट-माहूर तालुक्यांपासून तेलंगणाचा आदिलाबाद जिल्हा ४० किलोमीटरवर आहे. निजामाबाद जिल्हा १५० किलोमीटर अंतरावर तर तेलंगणाची राजधानी किनवटपासूम ३०० किलोमीटरवर आहे. त्या तुलनेत किनवट, माहूर तालुके नांदेड जिल्ह्याचे अंतर १५० किलोमीटरवर, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे ४५० किलोमीटरवर, तर राजधानी मुंबई ८०० किलोमीटरवर असल्याने खरेतर हे किनवट-माहूर तालुक्यांतील जनतेला परवडणारे नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.