जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूक पोलिसांनी दिलेले चालान भरल्याशिवाय आता पर्याय नाही. कारण वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ‘स्मार्ट नाकाबंदी’ अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याद्वारे बारकोडसारखा कुठल्याही वाहनाचा नंबर स्कॅन केला की थकीत चालानची संपूर्ण माहिती समोर येईल. तीन अथवा त्याहून अधिक चालान थकीत आढळल्यास वाहतूक पोलीस ते वाहन ताब्यात घेतील. बुधवारपासून नागपुरात वाहतूक पोलिसांचे ‘स्मार्ट नाकाबंदी’ अॅप चालान न भरलेल्या वाहनांचा शोध घेणार आहे.
वाहतूक पोलीस चालान डिव्हाईस (उपकरण) सोबतच शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ई-चालान करते. दररोज शेकडोच्या संख्येने ई-चालान केले जाते. अनेक वाहन चालकांना मोबाईलवर ई-चालानच्या सूचना दिली जाते. गेल्या दोन वर्षात वाहतूक शाखेने ३५ कोटी रुपये ई-चालान केले आहे. यातील १९ कोटी लोकांनी दंड भरला आहे. परंतु ४४ टक्के म्हणजेच १६ कोटी चे ई-चालान वाहन चालकांवर थकीत आहे. याच्या वसुलीसाठी वाहतूक शाखेने वेळोवेळी विशेष मोहीम राबविली. त्यानंतरही वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. थकीत ई-चालानची माहिती मिळविण्यासाठी स्मार्ट नाकाबंदी अॅप लाँच करण्यात आले आहे. हे अॅप वाहतूक शाखेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर राहणार आहे. त्यांना स्वतंत्र आयडी दिली जाणार आहे. त्या माध्यमातून ते अॅपचा वापर करून ई-चालानसोबत दंड सुद्धा वसुल करू शकतात.
थकीत चालानची अशी मिळेल माहिती
स्मार्ट नाकाबंदी अॅपमध्ये थकित ई-चालान माहिती मिळविणे अतिशय सोपे आहे. अॅपवर वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करताच, अथवा नंबर टाकताच वाहनाचे थकीत ई-चालानची माहिती पुढे येईल. संबंधित वाहन चालकावर तीन अथवा त्याहून अधिक चालान थकीत असल्याचे आढळल्यास दंड भरायला सांगण्यात येईल. जर तो दंड भरण्यास नकार देत असेल तर जागीच त्याचे वाहन ताब्यात घेण्यात येईल.
कारवाईतून पळ काढणे कठीण
या अॅपच्या माध्यमातून वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी एकमेकांशी जुळलेले राहील. वाहतूक कर्मचाऱ्याने केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती तो अधिकारी अथवा त्याच्या सहकाऱ्याला पाठवू शकतो. त्यामुळे कारवाईला टाळून पळ काढणाऱ्या वाहन चालकांनाही तात्काळ पकडणे सोपे जाईल.
दंड भरल्याशिवाय पर्याय नाही
१६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. चौकाबरोबरच मॉल, मोठे पार्किंग प्लाझा येथे मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत दंड भरल्याशिवाय चालकाना पर्याय नाही. वाहन चालकांवर दोन वर्षाचे १६ कोटी रुपयांचे ई-चालान थकीत आहे. नागरिकांना वेळोवेळी चालान भरण्याचे आवाहन केले आहे. वसुलीसाठी मोहीमसुद्धा राबविण्यात आली होती. लोकांनी चालान भरण्यास प्रतिसाद दिला नाही. आता वाहन स्मार्ट नाकाबंदीत अडकल्याद चालकाला दंड भरल्याशिवाय पर्याय नाही. राज्यात नागपूर व ठाण्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सारंग आव्हाड, डीसीपी, वाहतूक शाखा