लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : संख्याबळ कमी असतानाही हिवाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याचा दावा करत विरोधी पक्षाने रविवारी नवे महायुती सरकार ईव्हीएम सरकार असल्याचे जाहीर केले. रविवारी विरोधी पक्षाने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत विरोधी पक्ष सरकारला दिशा देणारे ठरेल असा दावा केला आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, राज्यातील जनतेमध्ये ईव्हीएम विरोधात रोष आहे. मारकडवाडीत सरकारने बॅलेट पेपरवर मॉक व्होटिंग करू दिले नाही. सोयाबीन, कापसाला भाव मिळत नाही. दुधाचे दर सरकारनेच कमी केले. अशा स्थितीत हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे स्पष्ट होत आहे. हे खुनी सरकार आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये स्थलांतरित होत आहेत. राज्य कर्जाच्या जाळ्यात अडकले. डिसेंबरमध्ये घ्यायचे कर्ज आधीच घेतले आहे, असा आरोप करीत विरोधी पक्ष राज्यातील जनतेसाठी लढतील, असा दावाही करण्यात आला.
विधीमंडळाचे कामकाज नियम व परंपरांच्या आधारे चालते. अशा स्थितीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते निवडण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. विरोधक सभापतींचा आदर करतात. ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी विरोधी पक्षनेतेपदावरून कुठलेही मतभेद नसल्याचा दावाही विरोधी पक्षनेत्यांनी केला. सर्वजण एकत्रच असल्याचे स्पष्ट केले.
बीडमधील ‘डॉन ऑफ इटली’
बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकी कराड याचे वर्तन हे 'गॉडफादर' चित्रपटातील 'डॉन ऑफ इटली'सारखे असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना राज्याने आता कोणती वाटचाल केली आहे, याचे द्योतक आहे.
अधिवेशनाचा कालावधी वाढवावा
विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी केवळ पाच ते सहा दिवस ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नागपूर करारासह अन्य करारांचे हे उघड उल्लंघन आहे, असे ते म्हणाले. विदर्भातील व्यक्ती मुख्यमंत्री असतानाही अधिवेशनाचा कालावधी कमी करणे हा विदर्भावर अन्याय आहे. याबाबत शासनाकडून उत्तर मागविण्यात येणार असून मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसच्या गटनेत्याची निवड मंगळवारी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत काँग्रेस आमदार गटाच्या नेत्याची निवड केली जाईल, असे सांगितले. बनावट औषधे, कायदा आणि सुव्यवस्था, प्रिय भगिनींना तपासाशिवाय २१०० रुपये देणे, पेपर फुटणे, दोन लाख लोकांची भरती आदी प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. याशिवाय बीड प्रकरणाची सीबीआय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.