नागपूर : नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. परंतु सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा होईलच याची शाश्वती नाही. गेल्या अडीच -तीन महिन्यापासून ३४ प्रश्न प्रलंबित आहेत. यावर चर्चा कधी होणार, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे. मनपा कायद्यानुसार सदस्यांनी प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नावर सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा होणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा प्रश्नोत्तराचा तास होत नाही. कधीकधी एखाद्या प्रश्नावरील चर्चा लांबते. त्यामुळे इतर प्रश्नांना न्याय मिळत नाही. तसेच सभागृह तहकूब झाले की, सदस्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात. त्यामुळे उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची व्यथा सदस्यांनी मांडली. २३ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजात २० जूनच्या सभेतील प्रलंबित ११ प्रश्न, २० जुलैच्या सभेतील १९ तसेच १७ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेतील प्रलंबित ४ प्रश्नाचा समावेश करण्यात आला आहे. नियमानुसार सभेच्या कामकाजात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा समावेश केला जातो. परंतु त्यावर चर्चा होत नसल्याने अनेक सदस्य सभागृहात प्रश्न उपस्थित करीत नसल्याचे चित्र आहे. २० जूनच्या सभेत सदस्यांनी नोटीस न देता हटविण्यात आलेले सीताबर्डी भागातील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, २०१४-२०१५ या वर्षात मनपाने किती झाडे लावली, त्यातील किती जिवंत आहेत. काचीपुरा येथील कृषी विद्यापीठाच्या जागेवरील लॉन किंवा बांधकाम अधिकृत आहे का. मनपामध्ये किती शिक्षणाधिकारी आहेत. सार्वजनिक रस्त्यावरील मंदिर, मशीद, बौद्धविहार तोडण्यासंदर्भात कोणते आदेश आहेत, अशा महत्त्वाच्या प्रश्नावर अद्याप चर्चा झालेली नाही. महत्त्वाच्या २० जुलैच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केलेले १९ प्रश्न प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)
सदस्यांच्या प्रश्नावरकधी होणार चर्चा ?
By admin | Updated: September 17, 2015 03:54 IST