राजेश पाणूरकर -नागपूरयंदाचे ८८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार; हेच जवळपास निश्चित करण्यात आले होते. पण ऐनवेळी पंजाबने उचल घेतली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलन झाले नाही. संत नामदेवाच्या घुमान या गावी हे संमेलन घ्यावे, असा आग्रह काही महामंडळ सदस्यांनी केला. घुमान येथील आयोजकही पूर्ण तयारीनिशी तयार असल्याने यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या गुरुदासपूर येथीव घुमान या गावी होणार आहे. संत नामदेवांच्या गावात हे संमेलन होत असल्याने हे साहित्य संमेलन संत साहित्यालाच अर्पण केलेले असेल, असा एकत्रित स्वर साहित्यिकांनी आळवला आहे. संत साहित्य संमेलन होण्यास कुणाचाही विरोध नाही. पण यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी असणारी गणितेच बदलली आहे. उस्मानाबाद येथे हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असते तर संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या साहित्यिकांनी आता माघार घेतली आहे. संत नामदेवांच्या गावात होणाऱ्या संमेलनासाठी बहुतेक संत साहित्यिकांनी कंबर कसली आहे. यात प्रामुख्याने पुण्याचे अशोक कामत आणि नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे इच्छुक आहेत. याशिवाय रामचंद्र देखणे, सदानंद मोरे, यशवंत पाठक यांनीही संमेलनाध्यक्ष होण्यासाठी तयारी दर्शविल्याचे कळले आहे. अद्याप कुणीही अधिकृतपणे समोर आलेले नाही आणि ती प्रक्रिया सुरूही झालेली नाही. अशोक कामत हे पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख आणि राष्ट्रभाषा प्रचार समितीचेही सदस्य आहेत. ते पुण्याचेच असल्याने त्यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून जोर लावण्याची तयारी सुरू केल्याचे कळले. तर डॉ. रवींद्र शोभणे संत नामदेव यांच्यावर नवी कादंबरी लिहित आहेत. त्यांच्या पुस्तकांनी रौप्यमहोत्सवी आकडाही गाठला आहे. डॉ. शोभणेंच्या पाठीशी विदर्भ साहित्य संघही उभा राहू शकतो. याशिवाय सदानंद मोरे यांनीही संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. यशवंत पाठक आणि रामचंद्र देखणेही या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
हे संत साहित्य संमेलनच होणार
By admin | Updated: July 3, 2014 00:48 IST