विद्यापीठ वर्तुळात नाराजी : व्यवस्थापन परिषद सदस्यांकडे लक्षनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला विद्यार्थ्यांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित पडले आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करण्याऐवजी प्रशासनाकडून मात्र वेगळीच भूमिका घेतली जात आहे. प्रशासनाने प्राधिकरणातील माजी सदस्य तसेच माजी अधिकाऱ्यांवर परीक्षा विभागात जाण्यास बंदी लावली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरुद्ध विद्यापीठ वर्तुळातील तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, २५० महाविद्यालयांतील प्रवेशबंदीच्या प्रकरणांत महाविद्यालयांची बाजू काही सदस्यांनी उचलून धरली होती. मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हे सदस्य प्रशासनाने लादलेल्या या ‘प्रवेशबंदी’वर बोलणार का आणि विद्यापीठ ही ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ आहे का असा संतप्त सवाल विद्यापीठातीलच अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर उपस्थित केला आहे.विद्यापीठाने नुकतेच एक परिपत्रक काढले. यानुसार विद्यापीठाच्या प्राधिकरणांवरील माजी सदस्य किंवा माजी अधिकाऱ्यांना परीक्षा भवनात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यांच्यामुळे परीक्षा भवनाच्या कामात व्यत्यय येतो असे कारण यात देण्यात आले आहे. याशिवाय दररोज प्रसिद्धीमाध्यमांमध्ये निघणारे धिंडवडे पाहता कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने प्रसिद्धीमाध्यमांना माहिती दिली तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.विद्यापीठ ही सार्वजनिक संस्था आहे. अशा स्थितीत कोणालाही परीक्षा भवनात जाण्यापासून कसे काय थांबविता येईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यवस्थापन परिषदेच्या सभेत हा मुद्दा समोर येण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांनी जाहीरपणे याबद्दल नाराजीदेखील व्यक्त केली आहे. बैठकीदरम्यान, प्रत्यक्ष हा मुद्दा उपस्थित होईल की नाही याबद्दल संभ्रम कायम आहे. सदस्यांनी संबंधित मुद्दा उपस्थित करून आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात अशी आशा माजी प्राधिकरण सदस्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
‘प्रवेशबंदी’ वर बोलणार कोण?
By admin | Updated: August 19, 2014 00:55 IST