अध्यक्षांचा राजीनामा : मंत्री, पदाधिकार्यांची दडी
नागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह राज्यातही सोमवारी विचारमंथन झाले. नागपुरात मात्र अशा मंथनासाठी कुणी पुढाकार घ्यायलाही तयार नाही. शहर अध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मात्र, अध्यक्ष सोडले तर नागपुरात मंत्री, माजी मंत्री, प्रदेश पदाधिकार्यांची मोठी फौज असताना, कुणीही बैठक घेण्यासाठी समोर आलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच काँग्रेसमधील उत्साह मावळला होता. लोकसभा निवडणुकीत ज्या नेत्यांवर कुठलीही जबाबदारी नव्हती, असे नेते पराभवासाठी आपण काहीच जबाबदार नाही, अशा आविर्भावात वावरत होते. खासगीत बोलताना प्रभारींच्या कार्यशैलीवर खापर फोडत होते. निकालाच्या तीन दिवसानंतरही तीच स्थिती आहे. काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांना सल्ला देण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक जणाच्या चर्चेत ‘असे करायला हवे होते, तसे व्हायला हवे होते’, असेच सल्ले ऐकायला मिळत आहेत. मात्र, आपण स्वत: पक्षासाठी, पक्ष कार्यकर्त्यांसाठी काय केले, यावर आत्मपरीक्षण करायला कुणीच तयार नाही. कार्यकर्ते शहर पदाधिकारी विकास ठाकरे यांना बैठक घेण्यासाठी आग्रह करीत आहेत. मात्र, पदाचा राजीनामा दिला असल्यामुळे कोणत्या अधिकारात बैठक घ्यायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. माजी खा. विलास मुत्तेमवार, रोहयो मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. दीनानाथ पडोळे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता या नेत्यांपैकी कुणीही पुढाकार घेण्यास तयार नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहे. सहाही मतदारसंघात भाजपची आघाडी पाहता काँग्रेसपुढे मोठे संकट आहे. अशात आता पराभव विसरून नव्याने मोट बांधली नाही तर विधानसभाही हातून जाईल, अशी स्थिती आहे. मात्र, नेत्यांनी दडी मारल्यामुळे कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)